कोलकाता – देशातील करोनाबाधितांमध्ये दरदिवशी मोठी भर पडत असताना भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी जावईशोध लावला. करोना संपला असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावरून पलटवार करताना तृणमूल कॉंग्रेसने घोष यांना उपचारासाठी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.
तृणमूलची सत्ता असणाऱ्या बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने आतापासूनच सभांचा धडाका सुरू केला आहे. अशीच एक सभा बुधवारी हुगली जिल्ह्यात झाली. त्यामध्ये घोष यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
सभेतील गर्दी पाहून ममतादीदींचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. करोनाच्या भयामुळे नव्हे; तर भाजपचा धसका घेतल्यामुळे तसे घडत आहे. करोना संपला आहे. मात्र, भाजपला सभा घेण्यापासून रोखण्यासाठी ममतादीदी राज्यात अनावश्यक लॉकडाऊन लादत आहेत, असे ते म्हणाले.
घोष यांच्या सभेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या सभेतील गर्दीचा भाग बनलेल्यांनी सोशल डिस्टन्सिंगची एैसीतैसी केल्याचे व्हिडीओवरून स्पष्ट झाले. दरम्यान, घोष यांच्या वक्तव्याचा तृणमूलचे खासदार कल्याण बंडोपाध्याय यांनी समाचार घेतला. देशात दरदिवशी 95 हजार, तर बंगालमध्ये 3 हजार करोनाबाधित वाढत आहेत. अशात घोष भलते आनंदी वक्तव्य करत आहेत. त्यांनी डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.