मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असल्याचे दिसत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा केला. या टीकेचा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. परंतु, आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले,’उद्धव जी, तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला आहे. आमचे नेते हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत. उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजपा नेत्यांना उद्देशून तुम्ही ‘ मर्दाची औलाद असाल तर‘ असे विधान केले. अशी भाषा एखाद्या गावगुंडाची असते.’अशा बोचऱ्या शब्दात बावनकुळे यांनी टीका केली आहे.