कोलकाता – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांना प. बंगालमधील भवानीपूर मतदारसंघात दारोदार प्रचार दौरा तृणमूल समर्थकांच्या आक्रमक विरोधामुळे मागे घ्यावा लागला. त्यांच्या विरोधात असणाऱ्या या निदर्शनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
तृणमूल समर्थकांनी घोष यांना लाथा घातल्या आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी केला आहे. जादू बबूर बाझार जवळ दोन्ही पक्षाच्या धुमश्चक्रीत एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.
या मतदारसंघातून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. तेथे प्रचाराचा आज (सोमवार) अखेरचा दिवस होता. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या संख्येने नेते उतरवण्याची व्युहरचना भारतीय जनता पक्षाने आखली होती. तेथे पक्षाकडून प्रियंका टिब्रेवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
घोष यांच्या विरोधात तृणमूलचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी घोष यांना परत जाण्यास सांगितले. त्यावेळी भाजपा समर्थक आणि बंदोबस्तावरील पोलिस यांच्याशी जमावाची ढकलाढकली सुरू झाली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी घोष यांच्या शरीररक्षकांनी सेवा रिव्हॉल्व्हर बाहेत काढल्याचे पहायला मिळाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घोष यांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पाठोपाठ येण्यास कार्यकर्त्यांना सांगितले.
घोष यांच्या सोबत असणारे भाजपाचे कार्यकर्ते भाव नारायण सिंह हे मात्र या जमावाच्या ताब्यात सापडले. जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांचे डोके फोडले. नंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घोष म्हणाले, आपण पाहिले असेल तर आमच्या दारोदार प्रचार मोहिमेला कोणतेही संरक्षण पुरवण्यात आले नव्हते. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याचे डोके फोडले. मलाही लाथा घातल्या. याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.
तत्पुर्वी सकाळी भाजपा खासदार अर्जुन सिंह यांना तृणमूलच्या निदर्शनाचा सामना करावा लागला. शंभुनाथ पंडित रुग्णालयाजवल त्यांनाही परत जा अशा घोषणांचा सामना करावा लागला.
या प्रकरणी तृणमूल कॉंग्रेसवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना तृणमूल नेते सौगाता रॉय म्हणाले, दिलीप घोष यांच्या विरोधात काही जणांनी जय बांगला अशा घोषणा दिल्या. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर बेछूट आरोप केले होते त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. जनतेचा घोष यांच्यावर राग होता, तो या निमित्ताने बाहेर पडला.