नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार टीकेच्या केंद्रस्थानी आलं आहे. त्यातच आता पक्षातील तब्बल १२६ आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं समजतं. योगी सरकारमधील मंत्र्यांनेच हा गौप्यस्फोट केला आहे.
पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्ताने योगी आदित्यनाथ यांची चिंता वाढली आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज आहेत. सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर नाराजी आहे, असं मंत्र्याचं म्हणणं आहे. या नाराज आमदारांची योगी आदित्यनाथ कशी समजूत काढणार आहेत. हे पाहाणे औत्युक्याचे ठरणार आहे.
योगी सरकारमधील आमदार व मंत्र्यांना विचारात न घेता कामे केली जातात. तसेच पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा यांना विचारात घेतले जात नाही. मात्र भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसामार्फत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे.
दुसरीकडे मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. आमदारांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. या बैठकीत फक्त करोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली.
काही दिवसांपूर्वीच भाजपचेच आमदार राकेश राठोड यांनी योगी सकरावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, राज्य सरकारमध्ये लोकप्रतिनिधींची लायकीच काय आहे ? जर मी अधिक बोललो तर माझ्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. यावरुन हे स्पष्ट होते की, योगी सरकारमधील आमदार व मंत्र्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.