निवडणुकीतील अपयशामुळे पदाधिकाऱ्यांची पदं जाण्याची चर्चा
पुणे – भारतीय जनता पक्षाची सत्ता 2014 मध्ये आल्यानंतर जिल्ह्यात काही महत्त्वाची पदं बहाल करण्यात आली होती. जिल्ह्यातही अनेकांना मानपान दिला गेला. परंतु, जिल्ह्यात भाजपचा केवळ एकच आमदार कसाबसा निवडून आला आहे. त्यातही राज्यातील सत्ता गेल्यामुळे गेली पाच वर्षे आमदारकीच्या नव्हे तर मंत्र्याच्या थाटात फिरणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पदे जाणार की राहणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यातीत सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, साखर कारखाने, बॅंका, सोसायट्या राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी शिवसेनेचाही बोलबाला आहे. आता या तिनही पक्षांची महाविकास आघाडी झाल्याने भाजप जिल्ह्यात एकाकी पडणार असल्याचे वास्तव समोर येत आहे. राज्यात 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात भाजपा सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना पदे देऊन तालुक्या तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न पक्षाने केला होता.
यामध्ये पक्षातील संघटनाची महत्त्वाची पदंही बहाल करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात याच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची फोडाफोडी करीत सहकारी क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. यात अनेक जण भाजपच्या गळाला लागले. राज्यात आघाडी सरकार असताना पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच अजित पवार यांनी ज्यांना-ज्यांना मोठ्या पदावर बसविले, असे काही नेतेही भाजपमध्ये डेरेदाखल झाले.
भाजपची हवा राज्यभर वाहत असताना अशा आयारामांना भाजपबाबत मोठ मोठी स्वप्नं पडू लागली होती. भाजपचे तालुकास्तरीय पदालाही आमदारकीचा दर्जा प्राप्त झाला होता. पदं वाटपातून भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करीत असताना जिल्ह्यातील सहकार क्षेत्रच मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला होता. याकरीता पक्षीय पातळीवर जिल्ह्यातील काही मातब्बरांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीयच नव्हे तर राज्यस्तरीय पदांचेही वाटप करण्यात आले होते. त्यामुळे भाजपची ताकद वाढत असल्याचे चित्र उभे राहू लागले होते.
मात्र, विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे वारे जोराने वाहू लागले. भाजपाचेच सरकार पुन्हा..पुन्हा येणार, अशा ठाम अतिविश्वासही अशा पद भूषविणाऱ्यांना होता परंतु, जिल्ह्यात केवळ एकाच जागेवर भाजपचा आमदार कसाबसा निवडून आला. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर नामुष्कीची वेळ आली. राज्य पातळीवर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. सत्ता गेल्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यातही असेच चित्र आहे. आता, जिल्ह्यातील अपयशाचे खापर कोणत्या पदाधिकाऱ्यावर भाजप फोडणार? पदं कायम ठेवणार का? असे प्रश्न पक्षीय पातळीवर उपस्थित होऊ लागले आहेत.