पाणी दूषित होण्याचा धोका; नगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष
सातारा – सातारा शहराची जीवनदायिनी असणाऱ्या कास तलावाला कचरा कुंडीचे स्वरूप येऊ लागले आहे. तलावाची मालकी असणाऱ्या सातारा नगरपालिकेने कास तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या कास पठाराजवळील तलाव परिसराची स्वच्छता न झाल्यास पर्यावरणप्रेमींनी गांधीगिरी करण्याचा इशारा दिला आहे.
कास पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून कासची महती संपूर्ण महाराष्ट्रात पोहचून पठारावर पुणे मुंबईसह विविध भागांतील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. कास पठारावर फुलांच्या हंगामासाठी गेल्या पाच वर्षात सहा लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. मात्र, पर्यटकांचे व स्थानिकाचे मौजमजेचे भान सुटल्याने कास तलाव, कास बंगला, पोलीस चौकी व वनराईला कचऱ्याचा विळखा पडू लागला आहे.
प्लॅस्टिकचे रॅपर, कागद, प्लॅस्टिक पिशव्या, डायपर नॅपकिन अशा कचऱ्यामुळे कास तलाव परिसराला कचरा कुंडीचे स्वरूप येऊ लागले आहे. हा कचरा पाण्यात जाऊ लागल्याने कासचा पाणीसाठा दूषित होण्याची भीती पर्यावरणप्रेमींना वाटत आहे. कास परिसरात खासगी प्रायोजकांच्या माध्यमातून कचराकुंड्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र, कचराच उचलला न गेल्याने दुर्गंधीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तब्बल 280 सफाई कर्मचारी आहेत. मात्र हे
कामगार कास तलाव परिसराला मात्र कधीच पाठवले जात नाहीत. सातारा शहरातील पर्यावरणप्रेमी संघटनांनी स्वच्छतेसाठी उपक्रम राबविले. मात्र, ते पुरेसे ठरू सकत नव्हते. पर्यावरणप्रेमींनी अनेकदा मुख्याधिकारी शंकर गोरे यांना निवेदने दिली. मात्र, प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झाली नाही.
कासच्या बंगला परिसरातही दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे. मेजवानी झोडल्यानंतर काही पर्यटक दारूच्या बाटल्या कास तलावात फेकून देण्याचे उद्योग करतात. पालिकेने येथे सुरक्षा रक्षक नेमूनही कास तलाव परिसरात सुरू असणाऱ्या आक्रस्ताळी प्रकारांवर नियंत्रण उरलेले नाही.
कास तलावाचे पाणी सातारकरांची तहान भागवते. या पाण्याची स्वच्छता ठेवणे सातारा पालिकेचे कर्तव्य आहे. आतापर्यंत मुख्याधिकारी गोरे यांना तीन वेळा निवेदने दिली. दहा वेळा खासगी भेटीत कास तलावाच्या प्रदूषणाची व कचरा समस्येविषयी सांगण्यात आले. मात्र, काही उपयोग झाला नाही. पालिकेने कास तलाव परिसराची स्वच्छता मोहिम न राबवल्यास गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
– कन्हैयालाल राजपुरोहित