मित्रपक्ष आळवू लागलेत विरोधी सूर
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निदर्शनांचे सत्र सुरू झाल्याने भाजपच्या बहुतांश मित्रपक्षांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाच्या (एनआरसी) विरोधात सूर आळवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एनआरसीच्या मुद्द्यावरून भाजप एकाकी पडू लागल्याचे चित्र समोर आले आहे.
भाजपच्या मित्रपक्षांनी संसदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे नागरिकत्व दुरूस्ती कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या भाजपने एनआरसीही लागू करण्याचे संकेत दिले. मात्र, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधामुळे देशभरात वातावरण तापले आहे. त्यामुळे प्रस्तावित एनआरसीबाबत भाजपच्या महत्वाच्या मित्रपक्षांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
सर्वप्रथम बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यात एनआरसीची अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले. बिहारमधील भाजपचा आणखी एक मित्रपक्ष लोजपनेही एनआरसीला विरोध करण्याचे संकेत दिले. त्यानंतर शनिवारी शिरोमणी अकाली दल या पंजाबमधील भाजपच्या मित्रपक्षाने आपली भूमिका मांडली.
सुधारित नागरिकत्व कायद्यात मुस्लिमांचाही समावेश केला जावा, अशी मागणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी केली. पत्रकारांनी त्यांना एनआरसीबाबत विचारले. त्यावर ते उत्तरले, एनआरसी काय आहे ते कुणालाच माहीत नाही. त्याविषयीचा तपशील समजू द्या. आताच काही बोलता येऊ शकणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भाजपेतर पक्षांच्या बहुतांश मुख्यमंत्र्यांनी याआधीच एनआरसीला विरोध दर्शवला आहे. आता भाजपचे मित्रपक्षही विरोधी सूर आळवू लागले आहेत. त्यामुळे तूर्त तरी एनआरसीचा विषय पुढे जाण्याची शक्यता कमीच असल्याचे मानले जात आहे. मात्र, भाजपच्या गोटातून मिळणारे संकेत पाहता तो पक्ष एनआरसीच्या मुद्द्यावरून माघार घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. सध्याची स्थिती निवळल्यानंतर मोदी सरकार पुढील पाऊल उचलेल, असे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.