पाटणा – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी तर्फे 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त देशव्यापी कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज येथे दिली. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि या कार्यक्रमांचा तपशील मात्र त्यांनी जाहीर केलेला नाही.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विरोधकांच्या एकजुटीने गोंधळून गेला आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने या महिन्याच्या शेवटी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ज्याचा अजेंडा त्यांनी जाहीर केलेला नाही असा आरोपही त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या धास्तीमुळेच भाजपने वन नेशन वन इलेक्शनचा फंडा काढला आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
नितीशकुमार काल रात्री मुंबईहून पाटण्यात परतले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. देशातील सार्वत्रिक जनगणनेला मोठा विलंब होतो आहे त्याविषयी केंद्र सरकार का भाष्य करीत नाही असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की अजून देशात जनगणना सुरू झालेली नाही. परंतु, नियमांनुसार ती खूप आधीच पूर्ण व्हायला पाहिजे होती.
या सरकारकडे इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, परंतु जात सर्वेक्षण आणि जनगणनेसाठी नाही, असे ते म्हणाले. मोदींनी आयोजित केलेल्या संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात आम्हीं जनगणनेला होत असलेला विरोध आणि जातनिहाय जनगणना हे विषय उपस्थित करू असे ते म्हणाले.