निसर्गात आपल्या सौंदर्याची उधळण करणाऱ्या विविध ‘सुमनां’मधील मधूर मकरंदासाठी फुलांमध्ये समरस होणाऱ्या “भ्रमरा’प्रमाणे वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात 24 तास समरस होऊन आपल्यातील मकरंदाच्या गोडीमुळे मतदारसंघातील लहानथोरांच्या जिभेवर चवीने रेंगाळणारा “आबा’, जनतेचा “हमदर्द’, दमदार आमदार मकरंद पाटील यांचा आज जन्मदिवस. करोना विषाणूची अडचण असली तरी जनतेच्या मनामनात त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दैनिक “प्रभात’च्या नजरेतून….
आपल्या समाजसेवेतून गेली अडीच दशके मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले आमदार मकरंद पाटील, आपल्या कर्तृत्वाने सर्वसामान्यांच्या मनामनातील “आबासाहेब’ जनतेच्या अडीअडचणींमध्ये अहोरात्र जननायकाची भूमिका पार पाडत आहेत. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील अन्य राजकीय नेत्यांचे फोन नेहमी “नॉट रिचेबल’ असताना आबांचा फोन 24 तास “रिचेबल असल्याने कुणाचेही कसलेही काम आजपर्यंत रखडल्याची तक्रार विरोधकांकडूनही येत नसल्याने दिवसेंदिवस जनतेच्या मनात आबांविषयीचा गोडवा (मकरंद) वाढलेला दिसून येतो, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
नावाप्रमाणेच शांत, संयमी असलेले मकरंदआबा जनहितासाठी कट्टर विरोधकालाही आपुलकीची वागणूक देण्यास कायम आग्रही राहिल्याने मतदारसंघातील खंडाळा तालुक्यातील लोणंद, पाडेगाव ते वाई तालुक्यातील 4000 फूट उंचीवरील अवघ्या 50 मतांच्या दुर्गम ओव्हळी गावाबरोबर महाबळेश्वर तालुक्यातील कंदाटी खोऱ्यापर्यंत 300 किमी लांबीच्या मतदारसंघातील एकही वाडीवस्ती शासकीय योजना, विकासापासून वंचित नाही.
प्रत्येक ठिकाणी विकासकामांचे डोंगर उभे केल्यानेच तीन दशके सर्वसामान्य जनता आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र तिन्ही तालुक्यातील गावागावात आहे. साहजिकच यातून आबांचे वेगळेपण सिद्ध होते. माणसाचे व्यक्तिमत्व कसे असावे, मित्र कसा असावा, मैत्री कशी असावी, मैत्रीतील गोडवा (मकरंद) जनतेचा हृदयात कसा ठायी ठायी असावा, याचे ठळक उदाहरण म्हणजे वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद पाटील! आपणास मतदारसंघातील तमाम जनतेकडून उदंड आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
करोना संसर्गाशी यशस्वी लढा
करोनाच्या भीषण परिस्थितीतही मतदारसंघातील जनतेला आधार देत, शासकीय यंत्रणा सक्रिय करून सर्वसामान्यांना चांगली आरोग्यसेवा पुरवताना आ. मकरंद पाटील यांना स्वतःला करोना विषाणूसंसर्गाचा सामना करावा लागला; परंतु त्यानंतरही करोनाबाधित गरीब रुग्णांना अनिल सावंत, दीपक ओसवाल, चरण गायकवाड, प्रदीप जायगुडे, प्रदीप चोरगे व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने जेवण, औषधे मोफत उपलब्ध करून सेवाभाव जपली. मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर करोनावर मात करून आबा पुन्हा लोकांच्या सेवेसाठी कार्यरत झाले आहेत.