आ. मकरंद पाटील यांनी आपल्या आजारी असलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला जाणे, हे नित्याचेच होते; पण केवळ कार्यकर्त्यांच्या नव्हे तर मतदारसंघातील जनताजनार्दनाच्या व्यथा, वेदना, आजाराविषयीदेखील आमदारांची भूमिका अशीच होती, म्हणून त्यांचे परिवर्तनाचे स्वप्न सच्चेपणाचे आहे, असे म्हणता येईल. मकरंद पाटील आमदार असले तरी आधी कार्यकर्ता आहेत. 25 जानेवारी 2005 रोजी मांढरदेव येथे चेंगराचेंगरीत शेकडो निष्पाप भाविक मृत्युमुखी पडले.
तेव्हा मकरंद पाटील आमदार नव्हते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या यात्रेकरूंना मदत, मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे पुढील सोपस्कार, वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये मिशनरी वृत्तीने त्यांनी केलेली रुग्णसेवा म्हणजे माणुसकीला मिळालेला कृतिशील दिलासा होता. त्यावेळची मकरंद पाटील यांची कामगिरी प्रशंसेस पात्र ठरली होती. तेव्हापासून अगदी गतवर्षी आंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेपर्यंत आ. मकरंद पाटील हे घटनास्थळी जातीने हजर राहिले. 2020 चा मार्च महिना संपताना मुंबईपाठोपाठ सातारा जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाला. सजग लोकप्रतिनिधी म्हणून आ. पाटील गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचवली.
मोठे उद्योग समूह, शासन, प्रशासन, कार्यकर्त्यांना कृतिप्रवण केले. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यावर प्रत्येक गावातील बाधितांच्या कुटुंबीयांना आ. पाटील यांनी दिलासा दिला. दिवसाचे पंधरा पंधरा तास ते जनतेसाठी उभे होते. सततच्या दगदगीने, आघाडीवर राहून काम केल्याने आ. पाटील यांनाच करोना संसर्ग झाला. हजारो मतदारांशी बांधिलकी असणारा हा योद्धा जखमी झाला. तत्पूर्वीचे चार महिने या लोकप्रिय नेत्याने जनतेला घरातच राहून काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले. प्रशासनाशी संवाद ठेवला. मतदारसंघातील साडेतीनशे गावांमधील हजारो बाधितांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत राहिले. 17 हजार गरजूंना जीवनोपयोगी साहित्य, पाचगणी, महाबळेश्वरात 450 घोड्यांना चारा उपलब्ध केला.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानायलाही ते विसरले नाहीत. शिंदेवाडी-शिरवळ येथे काम करणारे पोलीस कर्मचारी, आरोग्यसेवकांची सर्व व्यवस्था होईल, याची काळजी घेतली. कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी मतदारसंघात रेमडेसिवीर इंजेक्शनची बॅंक तयार करण्याचा संकल्प केला. सेवाव्रती, दानशूर मंडळींना इंजेक्शन दानाचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गोरगरिबांना मोफत तर ऐपत असणाऱ्यांना अल्प किमतीत इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली. नेतेमंडळींना व्यक्तिगत प्रपंचात अडकता येत नाही; पण त्यांच्यामुळे कुटुंबीयांना त्रास सोसावा लागतो. मकरंद पाटील यांच्यानंतर पत्नी सौ. अर्चना, कन्या मिहिका, बंधू मिलिंद व नितीन पाटील यांनाही संसर्गाने गाठले.
आमदारांचा आरोग्ययज्ञ असफल होणार होता; परंतु कोविडच्या संकटावर मात करून हा योद्धा नव्या दमाने पुन्हा कार्यरत झाला. जनतेच्या उत्कर्षाचा विचार करत, आरोग्य हाच जीवनाचा पाया आहे, हे ओळखून पुन्हा उभे राहिले. माणुसकीचा हा गहिवर, भावनांचा हा पाझर वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमधील जनतेच्या भाग्यात आला आहे. करोनाविरुद्धच्या युद्धात आरोग्यगीता सांगणारा हा नेता मानवमित्र आहे आणि राहील! त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!