नवी दिल्ली – महाराष्ट्रासह पाच राज्यांमधील पोल्ट्रीच्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाल्याचे तसेच नऊ राज्यांमध्ये कावळे आणि स्थलांतरीत आणि रानटी पक्षांमध्ये याचे विषाणू आढळल्याचे केंद्रीय मासेमारी, पशू संवर्धन आणि दुग्धोत्पादन खात्याने सोमवारी स्पष्ट केले.
या पाच राज्यांपैकी शीघ्र प्रतिसाद दलाने महारारष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा आणि छत्तिसगढ येथील पोल्ट्रीमधील पक्षांची कत्तल करण्यात येत आहे. केंद्राचे पथक देशात साथ पसरलेल्या भागांचा दौरा करत आहे. या साथीचा उद्रेक झालेल्या महाराष्ट्राला या पथकाने भेट दिली आहे.
त्यानंतर केरळमधील साथीचा अभ्यास सुरू केला आहे. बर्ड फ्ल्यू हा स्थलांतरीत पक्षांकडून देशात सष्टेंबर ते मार्च या काळात पसरतो. हा आजार झूनोटिक म्हणजे जनावरांमधून माणसांत पसरू शकतो. मात्र त्याचे देशांत अद्याप एकही उदाहरण मिळालेले नाही.
महाराष्ट्राबाबत माहिती देताना केंद्राने म्हटले अहे की, साथीच्या केंद्रस्थान असणाऱ्या सर्व ठिकाणांवरील पोल्ट्रीमधील पक्षी मारण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील पोल्ट्री विकास संस्थेच्या केंद्रात पक्षांची कत्तल करण्यात येत आहे. तसेच स्वच्छता आणि निर्जतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी, अहमदपूर, सुकनी ही गावे तर उदगीर तालुक्यातील तोंडार (वज्रवाडी) आणि औसा तालुक्यातील कुर्दवाडी या गावातील हे काम पूर्ण झाले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी ट्विटर, फेसबुकसारख्या समाज माध्यमांद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.