पाटणा – देशभरात करोनाचा उद्रेक असताना दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. जदयु नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही प्रचार सुरू केला असून, त्यांच्याविरोधात राजदचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे मैदानात उतरले आहेत.
करोनामुळे बिहारमध्ये सध्या व्हर्च्युअल रॅलींवर भर दिला जात आहे. तर, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जदयु-भाजप युतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच तेजस्वी यादव यांनी ट्विट करताना ‘मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दोन अंकी जागा मिळणेही अशक्य आहे,’ असे म्हटले आहे.
तर, सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन रॅलींमधून नितीशकुमार हे सातत्याने लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांच्या राजवटीतील त्रुटींवर बोट ठेवत आहेत. ‘बिहारमध्ये १५ वर्षे ‘पती-पत्नी राज होते. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला होता,’ अशी टीका या सभेतून नितीश कुमार यांनी केली आहे.
तर, कोणतेही पद आणि सत्ता नसताना तेजस्वी यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? असा सवालही नितीशकुमार यांनी केला आहे. तेजस्वी यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, म्हणून आपण त्यांच्यासोबतची युती तोडली, असाही दावा नितीश यांनी केला आहे.