मुंबई – गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या किंमती 150 रुपये प्रति किलोच्याही पुढे गेल्या आहे. 20-25 रुपये प्रति किलो मिळणारे टोमॅटो अचानक 150 पार गेल्याने सर्वसामान्यांना ते खरेदी करणे कठीण झाले आहे. मात्र सरकारने आता यावर उपाय काढला असून 14 जुलैपासून टोमॅटोच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे. 14 जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून कमी दराने विकले जातील, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
मुसळधार पावसामुळे टॉमेटोचा पुरवठा खंडित होता. परिणामी देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किंमती 200 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी करणार आहेत. त्यामुळे किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणी टॉमेटोच्या किमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी कमी किमतीत टोमॅटोचे वितरण केले जाणार आहे.
जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी असते, याशिवाय जुलैमध्ये पावसाळ्यामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. टोमॅटो उत्पादनात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातून नवीन पीक लवकरच येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.