धुळे – धुळ्यातील साखरी तालुक्यातील निजामपूरपासून पुढे तीस किमी अंतरावर असलेल्या चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला शॉर्टसर्किट झाल्यानं भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना नंदुरबारला रुग्णालयात हालवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनवल्या जात होत्या. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, यामध्ये होरपळून चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत आणि राजश्री भैया भागवत, नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चौघींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पण संपूर्ण तपासानंतरच आगीचं नेमकं कारण आणि इतर गोष्टी लवकरच समोर येतील असं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितलं आहे. तसेच, या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे.