पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याची दाखविण्याच्या नादात राजकीय दबावापोटी महापालिकेकडून कार्यादेश देण्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेण्या आधीच विकासकामाचे भूमीपूजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सुट्टीच्या दिवशी या कामांचे कार्यादेश देण्यात आले. घोरपडी पुलांचे भूमीपूजन झाल्यानंतर हे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, महापालिका प्रशासनाला नेमकी कोणासाठी आणि कशासाठी नियमबाह्य काम करण्याची घाई झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधले जाणार आहेत. तर, घोरपडी येथे पुणे-मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल या दोन्ही कामांच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर कार्याआदेश देणे आवश्यक होते. मात्र, या नियमाला केराची टोपली दाखवत प्रकल्प विभागाने राजकीय दबावापोटी थेट कार्यादेश दिले. त्यानंतर आता हा प्रस्ताव स्थायी समितीत दाखल झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महाशिवरात्रीनिमित्ताने पालिकेला सुट्टी असताना मान्यता देण्यात आली. प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याच दिवशी स्वाक्षरी करून कार्यादेश काढले आहेत. या निविदेचा हा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, या बाबत संबंधित विभाग, आयुक्त कार्यालय तसेच नगरसचिव विभागाकडे याबाबत चौकशी केली असता याचे कोणतेही उत्तर कोणत्याही अधिकाऱ्यांकडे नाही.