जालना – छगन भुजबळांना मंत्री पदावरून हटवून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. पिस्तुलाची भाषा बोलून भुजबळ मराठा आंदोलकांना बदनाम करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी अन्यथा ते दोघेही टारगेटवर असतील, असा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ लईच येडे आहेत. कधी शहाणे होतील काय माहिती. आता त्यांच्या नादी लागायचे नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. शनिवारी बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोर जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीमागे जरांगे पाटलांचा हात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी या सभेमधून केला होता. या आरोपांवर आता जरांगे पाटील यांनीही सडेतोड उत्तर देत पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बदनामी करणारे शोधणार
मराठ्यांचा गनिमी कावा कसा असतो हे मुंबईत पहा, त्यांनी कितीही कलम १४४ लावले तरी मराठा समाज मुंबईमध्ये येणारच. आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या लोकांना बदनाम करणारे कोण आहेत हे शोधून काढणार आहे, असा इशाराही जरांगेंनी दिला. तसेच, भुजबळ गरिबावर अन्याय करण्यासाठी मंत्री पदाचा वापर करत आहेत. कायदा पायदळी तुडवत आहे. दंगली घडवण्याची भाषा बोलली जात आहे, असेही ते म्हणाले.