– विलास मादगुडे
हिरडस मावळ -बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक संस्कृतीचा वारसा आणि शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. शासनाने आणि आता उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर आता शहरापासून ग्रामीण भागापर्यंत बैलगाडा शर्यतींचा धराळा उडताना पाहायला मिळत आहे.
त्यात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या असन, त्यात मागील काळाच्या तुलनेत भोर तालुक्यातही या वर्षी बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत भोर, भाबवडी, शिंद, भोरच्या हायवे पट्ट्यात शर्यती झाल्या आहेत. मात्र, यात आता राजकीय धुमाळीही दिसू लागली आहे.
नेतेमंडळी, नव्यानं राजकारणात येणारं नेतृत्व, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मोठमोठाली आणि आकर्षिक बक्षिसे तसेच घाटाचा राजा, केसरी असे वेगवेगळे किताब ठेवण्यात येत असल्याने शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा स्पर्धकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शर्यतीत शेकडो बैलगाडे भाग घेत आहेत. त्यात उद्घाटन आणि बक्षीस समारंभास राजकीय नेत्यांसह इतर क्षेत्रांतील मान्यवरांच्या हजेरीमुळे वारंवार होणाऱ्या शर्यती पाहण्यासाठी गर्दीही होऊ लागली असून, यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
सध्या गावागावांतील ग्रामदैवतांचा यात्रा महोत्सव चालू आहेत त्यासाठी आणि याबरोबरच राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या वाढ दिवसानिमित्तही बैलगाडा शर्यती होताना दिसत आहेत. सकाळपासूनच बैलगाडा शौकिनांची सुरू झालेली गर्दी अगदी शर्यती संपेपर्यंत स्पर्धेच्या मैदानावर, घाटांमध्ये भर उन्हातही कमी होताना दिसत नाही. या शर्यतींच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, वडापाव, आइस्क्रीम, भेळ असे छोटे व्यावसायिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्यावरही राजकीय वरदहस्त दिसून येत आहे.
शर्यतीमध्ये नाव होण्यासाठी स्पर्धा
वाढत्या शर्यतींमुळे बैलांना मागणी वाढली आहे. बैलांच्या किमतीही वाढल्या आहेत. मोठ्या किंमतीचे बैल खरेदीकडे बैलगाडा मालकांचा कल आहे. हा बैलगाडा शर्यतीचा नादच असा आहे की वेळ प्रसंगी काही जण कर्जे काढून अथवा उलाढाल करत स्वतः अथवा भागीदारीत बैल खरेदी करत आपला नाद पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये आपले नाव कसे होईल, यासाठी स्पर्धा सुर असल्याचे दिसत आहे.
शर्यतकाळात स्थान पक्के
शयरतीकाळात मोठे बॅनर, सोशल मीडियावर जाहिरात करत शर्यती भरवल्या जातात. त्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्षभरांपासून लांबल्याने राजकीय युवा नेते, कार्यकर्ते बैलगाडा शर्यतीचा आनंद घेताना दिसत आहेत आणि त्यानिमित्ताने आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अजूनही निवडणुकांची अनिश्चितता
खरं पाहता वर्षभर लांबलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आता होणे अपेक्षित आहे. सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे दिसून यायला पाहिजे होते; परंतु या निवडणुकांच्या अनिश्चिततेमुळे या राजकीय रणधुमाळीची जागा बैलगाडा शर्यतींनी घेतली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.