भिगवण – इंदापूर तालुक्यातील भिगवण लगतच्या करमाळा व कर्जत तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. सध्या बिबट्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. भिगवण येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने भिगवणकरांची पाचावर धारण बसली आहे.
करमाळा तालुक्यात बिबट्याने धुडगूस घातल्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भिगवणमधील शेतकरी पोपटराव जगताप यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम सुरू असताना दोन बिबटे दिसले. त्यामुळे परिसरात शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असतानादेखील वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या परिसरात बिबट्या दिसल्याने ऊस तोडणी आणि शेतीच्या कामांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
भिगवण येथील घटनेची चौकशी करून तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल. त्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. विनाकारण बाहेर पडू नये, रात्री शेतात जावू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये.- राहुल काळे, वनअधिकारी
भिगवण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी, शेतात काम करण्यासाठी एकटे बाहेर पडू नये. मोठ्या आवाजाची साधने बाळगत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
– जीवन माने, पोलीस निरीक्षक भिगवण