संतोष तानाजी वाळके यांची अनोखी सेवा
चऱ्होली – आळंदीत महावैष्णव, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी वारी यात्रेला आळंदी येथे प्रारंभ झाला आहे. 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत दरवर्षी प्रमाणे पारंपरिक व संप्रदायिक नियमांप्रमाणे समाधी सोहळ्याचे कार्यक्रम होणार आहेत.
यात्रेला सुरुवात होणार या अगोदर संत ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त आपल्या परीने निःस्वार्थ सेवा देण्याचे काम अविरत करीत आहेत. यामध्ये दिघी परिसरातील शिवसेना विभाग प्रमुख व वारकरी परंपरेचा वारसा पिढ्यानंपिढ्या जपणारे संतोष तानाजी वाळके यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.
वाळके यांनी सेवाभावी वृत्तीने माऊली मंदिर व संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाई करण्याची इच्छा लेखी स्वरूपात आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिर व्यवस्थापन व विश्वस्त यांना कळवली होती. माऊली भक्ताची ही आर्त हाक माऊलींने ऐकून घेतली असून विश्वस्त मंडळाने त्यांना मंदिर परिसरात रोषणाई करण्यासाठी परवानगी दिली.
यापूर्वी सुद्धा प्रत्येक आषाढी वारीमध्ये संतोष वाळके यांनी अन्नदान व विविध उपक्रमाने सेवा माउलींच्या चरणी अर्पण केली आहे. यावर्षी सुद्धा आषाढी वारीला माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी सेवा देण्यासाठी मंदिर व्यवस्थापन मंडळाकडे विनंती केली होती. मात्र करोनाच्या संकटात ही सेवा त्यांना लाभली नसली तरी आता मिळालेल्या सेवेने माऊलींचा साक्षात आशीर्वाद मिळाल्याचा आनंद त्यांनी आपल्या शब्दांत व्यक्त करून आपल्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविले आहे.