शंभर वर्ष उलटली तरीही पुनर्वसनाच्या जमिनी मिळालेल्या नाहीत
दत्तात्रय बांदल
भाटघर- भाटघर धरण बांधताना उत्तर व दक्षिणेकडील 40 गावांची 5 हजार 670 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. याला शंभर वर्ष उलटली तरीही पुनर्वसनाच्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला धरण असल्याने शेतीसाठी जमीन अल्प स्वरूपात आहे. या भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरात नवीन उद्योग येण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारने धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.
भाटघर धरण हे ब्रिटिश राजवटीत बांधले आहे. धरण बांधताना येथील नागरिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. संबंधितांना धरणग्रस्त दाखले देण्याचे काम अद्याप सुरू आहे, परंतु आजतागायत शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या जमिनी मिळालेल्या नाहीत. जमिनी संपादित होऊन शंभर वर्षे लोटली आहेत. या कालावधीत एक पिढी संपली असून दुसरी पिढीही संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही न्याय न मिळाल्याने येथील नागरिक सरकारच्या धोरणावर नाराज आहेत.
भाटघर धरणाच्या उत्तरेला भुतोंडे खोरे असून दक्षिण बाजूस वेळवंड खोरे आहे. या दोन्ही खोऱ्याला एका बाजूला धरण आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगर अशी भौगोलिक परिस्थिती आहे. यामुळे कसण्यासाठी अल्प जमीन आहे. या दोन्ही खोऱ्यात उद्योग-व्यवसायाचा अभाव असल्याने येथील बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. भोर परिसरात एमआयडीसी नसल्याने येथील तरुणांना पुणे, मुंबई यासारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. तर काही नागरिकांना शेतीवर अवलंबून राहावे लागत आहे. भात पिकाच्या उत्पादनासाठी काही महिने शेतात कष्ट करावे लागते. तर वर्षातील उर्वरित वेळेत भोर, नसरापूर या ठिकाणी जाऊन मोलमजुरी करावी लागते.
- वीजपुरवठा वारंवार खंडीत
भाटघर परिसर डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे. या भागात महावितरणची सेवा पसुरे फिडर मार्फत पुरवली जाते. या फिडरची व्याप्ती 175 किलोमीटर एवढी अवाढव्य आहे. पसुरे फिडरची व्याप्ती जास्त असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. या भागात झाडांचे प्रमाण जास्त असल्याने कुठे ना कुठे झाडांच्या फांद्यांचे घर्षण वीजेच्या तारेला झाल्याने सतत वीज खंडित होत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना अनेक वेळा तीन ते चार दिवस अंधारात राहावे लागते. - रस्त्याची दुर्दशा
वेळवंड खोऱ्यातील रस्ता चांगला असला तरी भुतोंडे खोऱ्यातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागते. यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. खराब रस्त्यामुळे पर्यटक तालुक्यात येण्यास तयार नाहीत. याचा परिणात पर्यटन व्यवसायावर झाला आहे. - पुनर्वसनाच्या जमिनी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तरुणांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी सेंद्रीय शेती, बागायत शेती केली पाहिजे. कृषी पर्यटन तयार केल्यामुळे पर्यटक आकर्षिले जाणार आहेत.
– विठ्ठल आवाळे, जिल्हा परिषद सदस्य - शंभर वर्षे उलटली तरी आम्हाला पुनर्वसनाच्या जमिनी मिळाल्या नाहीत. आम्ही विविध समस्यांच्या विळख्यात असून शासनाने आमच्या समस्या सोडवाव्यात.
– तुळशीराम गायकवाड, प्रकल्पग्रस्त तळे म्हसवली गाव