नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 8 ऑगस्ट रोजी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला जाणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्नची घोषणा केली होती.
नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सन्मान मरणोत्तर दिला जाणार आहे. हा सर्वोच्च नागरी सन्मान अखेरच्या वेळी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) देण्यात आला होता. आतापर्यंत 45 सन्माननीय व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 25 जानेवारी 2019 च्या घोषणेनंतर ही संख्या 48 झाली आहे.
प्रणव मुखर्जी यांचा 2017 मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला होता. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच सर्वांनांच आश्चर्याचा धक्का बसला होता. राष्ट्रपतीच्या कार्यकाळात त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध होते. मुखर्जी यांनी मागीलवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर वाद उत्पन्न झाला होता.