नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी जी भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे, ती यात्रा आसामात आली असताना त्या यात्रेत खुद्द राहुल गांधी सहभागीच झालेले नव्हते, त्या ऐवजी त्यांच्या सारखा दिसणारा एक डुप्लिकेट इसम त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणून बसवण्यात आला होता असा खळबळजनक दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत केला होता. एक उपरोधिक टीका म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले असावे असे बहुतेकांचे सुरूवातीचे मत होते. परंतु स्वत: मुख्यमंत्री सरमा हे आपल्या दाव्यावर ठाम असून आज त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांच्यासारख्या ज्या दुसऱ्या तोतया इसमाला तिथे बसवले गेले होते त्या इसमाचे नाव आणि पत्ता आपण लवकरच जाहीर करू सरमा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते की यात्रेच्या बस मधून जी व्यक्ती लोकांना हात दाखवत बसली होती ती व्यक्ती राहुल गांधी नव्हती तर दुसराच कोणी तरी त्यांचा बॉडी डबल म्हणजेच तोतया इसम होता. तशा आशयाची एक बातमीही प्रसिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. आज त्याचा सरमा यांनी पुनरूच्चार करीत या राहुल गांधींच्या तोतयाचे नाव आणि पत्ता आपण लवकरच जाहीर करू असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की मी केवळ हवेत हा दावा करीत नाही, त्या डुप्लिकेटचे नाव आणि ते त्याने हे कसे व कशासाठी केले हे सर्व तपशील मी सांगेन. फक्त काही दिवस प्रतीक्षा करा,असे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सोनितपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले. सरमा म्हणाले की, मी उद्या (रविवार) दिब्रुगढमध्ये असेन आणि दुसऱ्या दिवशीही मी गुवाहाटीच्या बाहेर असेन. गुवाहाटीला परत आल्यानंतर मी डुप्लिकेटचे नाव आणि पत्ता देईन.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मणिपूर-महाराष्ट्र न्याय यात्रा १८ ते २५ जानेवारी दरम्यान आसाममधून फिरली होती, त्या दरम्यान राहुल गांधी यांनी सरमा हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांच्या यात्रेला अनेक प्रकारचा त्रास दिला गेला. यात्रेतील कॉंग्रेस नेत्यांवर हल्ले केले गेले, त्यांना सभेसाठी परवानगी नाकारण्यात आली, गुवाहाटी शहरात प्रवेशही नाकारण्यात आला होता. त्यानंतर राहुल गांधींनी सरमा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तेव्हापासून सरमा हे राहुल गांधी यांच्यावर विविध प्रकारचे आक्षेप घेत आहेत.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना गुवाहाटीच्या मुख्य शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी उभारण्यात आलेले पोलिस बॅरिकेड्स तोडले तेव्हा परिस्थिती चिघळली.राहुल गांधी यांच्यावर आसामात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल असा दावाही मुख्यमंत्री सरमा यांनी केला आहे. तथापि यात्रेत राहुल गांधी यांच्याऐवजी त्यांचा डुप्लिकेट प्रवास करीत होता हा त्यांचा दावा मात्र अवाक करणारा ठरला आहे.