नवी दिल्ली : येत्या काळात राज्यावर दुष्काळाचे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच कारण म्हणजे यंदा एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. याचा परिणाम मान्सूनवर होण्याचे भाकीत अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने केले आहे. त्यामुळे उन्हाळा संपताना दुष्काळासह अनेक संकट देखील ओढावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आधी पाऊस त्यानंतर अवकाळी आणि भविष्यात कदाचीत महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट येण्याची शक्यता आहे. अमिरीकेच्या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजावर भारतीय हवामान विभागाने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. जून ते डिसेंबर दरम्यान, 55 ते 60 टक्के एल निनोच्या प्रभावाची शक्यता आहे. हिंदी महासागराच्या तापमानातील तफावत दाखवणारा हा घटक आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या डेटाच्या आधारे एल निनोच्या प्रभावबद्दल अमेरिकेच्या संस्थेने अंदाज वर्तवला असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. त्यामुळे आपण एप्रिलपर्यंत वाट पाहू. ज्यावेळेस भारतीय हवामान विभाग आपला अंदाज वर्तवेल त्यावेळी जर एल निनो असेल तर त्याची माहिती दिली जाईल असेदेखील विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अरबी समुद्राचे तापमान जर मान्सून काळात जास्त असेल तर त्याला पॉझिटीव्ह आयओडी असे म्हटले जाते आणि बंगालच्या उपसागरात तापमान जास्त असेल तर त्याला निगेटीव्ह आयओडी असे म्हटले जाते. पॉझिटीव्ह आयओडी ज्यावर्षी असेल त्यावेळी मान्सून काळात चांगला पाऊस होत असतो.