पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्यापासून राज्यातील इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसणार असून नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होत आहे. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.
राज्य मंडळाच्या वतीने 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. यंदाच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 13 हजार 721 परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशी सूचनाही डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.