वेल्हे -किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी आलेल्या चार जणांच्या कुटुंबावर सुवेळामाची येथे मधमाश्यांनी हल्ला केला. यात रोहिणी सागर वराट (वय 29, रा. वाकड, पुणे) या दोनशे फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी नसरापूर येथे नेण्यात आले आहे. त्यांचे पती सागर वराट, मावसभाऊ आण कुटुंबातील अन्य सदस्यांनाही माश्यांनी चावा घेतला असून, त्यांना जुलाब-उलट्या होत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.
बेळगाव तेथून आलेल्या सोळा पर्यटकांना देखील माशांनी चावा घेतला. दरीत पडलेल्या महिलेला वर काढण्यासाठी आणि बाधितांना झोळी करून राजगड पायथा पाली व गुंजवणे येथे आणण्यासाठी स्थानिकांसह खोडद (ता. जुन्नर) येथून आलेले आणि नाशिकमधील पर्यटकांनी मदत केली. राजगडावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी सहलीसाठी पर्यटक येत आहेत. यातील काही पर्यटकांच्या उपद्रवीपणामुळे, तसेच सुगंधित अत्तरे, अन्य सुगंधित द्रव्य, सिगरेट, बिडी यांच्या वासामुळे माश्या चलबिचल होतात आणि हल्ला करतात, असे मत गुंवणेचे पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ यांनी व्यक्त केले.