राहुरी – मांजरी येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक सुरू असताना काही आरोपींनी तेथे येऊन बैठक घेणाऱ्या लोकांना धक्काबुक्की व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बैठक उधळून लावल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देवळाली प्रवरा येथे 18 जुलै रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी भिल्ल समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दुपारी एक वाजेदरम्यान मांजरी येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठक चालू होती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा तेथे आलेल्या आरोपींनी येथे बैठक घेण्यास विरोध केला. त्यावेळी संदीप बर्डे त्यांना म्हणाले की, आम्ही येथे मीटिंग घेणार. या गोष्टीचा आरोपींना राग आल्याने त्यांनी बर्डे यांची गचांडी धरली. त्या वेळी इतर काही लोक त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून संगीता बर्डे, सविता ठाकर, अनिल जाधव, पोपट माळी, मनीषा बर्डे यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही येथे मीटिंग घेतली, तर तुम्हाला गावात ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी बाळू अण्णासाहेब विटनोर, सागर बाबूराव विटनोर, भाऊसाहेब तुकाराम विटनोर, राजेंद्र अण्णासाहेब विटनोर, राहुल पोपट बाचकर, मिठू अण्णासाहेब विटनोर, प्रमोद भाऊसाहेब विटनोर, बाळू पोपट बाचकर, ऋतिक रावसाहेब बाचकर (सर्व रा. मांजरी, ता. राहुरी) या नऊ जणांवर शिवीगाळ दमदाटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आज वंचित बहुजन आघाडीची बैठक उधळून लावण्यात आली. कोणी कितीही कट कारस्थाने केली, तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी आमचा लढा सुरूच ठेवणार असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव, साईनाथ बर्डे यांनी सांगितले.