लोणी काळभोर, (वार्ताहर) -आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून देश-विदेशात प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभलेल्या नटश्रेष्ठ राजकपूर यांच्या घरातील 5 जण सभासद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 21 जागांसाठी 9 मार्च रोजी होणा-या निवडणुकीसाठी 21 हजार 19 सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. त्यापैकी अंदाजे चार हजार सभासद शेतकरी मध्यंतरीच्या काळात मयत झाले आहेत.
सर्वात जास्त 1887 सभासद लोणी काळभोर गावात असून सर्वात कमी प्रत्येकी 1 सभासद हिंगणे बुद्रुक, कोंढवे बुद्रुक व मोशी या तीन गावांत आहेत. गट क्रमांक 1 मध्ये उरुळी कांचन, भवरापूर, बोरी भडक, बोरी ऐंदी, डाळींब, खामगाव टेक, नांदूर, सहजपूर, ताम्हाणेवाडी व टिळेकरवाडी या गावांचा समावेश आहे. गट क्रमांक 2 मध्ये आळंदी म्हातोबा, कोरेगाव मूळ, नायगाव, पेठ, शिंदवणे, सोरतापवाडी, तरडे व वळती या गावांचा समावेश आहे. गट क्रमांक 3 मध्ये लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊर, उरुळी देवाची, वडकी या गावांचा समावेश आहे. गट क्रमांक 4 मध्ये औंध, खडकवासला, खेड शिवापूर, महमदवाडी, मांजरी बुद्रुक, मुंढवा, पुणे शहर, उंड्री अशा 41 गावांचा समावेश आहे. गट क्रमांक 5 मध्ये वाघोली, आव्हाळवाडी, केसनंद, कोलवडी, लोहगाव, मांजरी खुर्द, निरगुडी, साष्टे, तळेरानवाडी, वडगाव शिंदे या गावांचा समावेश आहे. गट क्रमांक 6 मध्ये अष्टापूर, बिवरी, मिरवडी, पिंपरी सांडस अशा 22 गावांचा समावेश आहे.
अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार
कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, माजी संचालक पांडुरंग काळे, राजीव घुले, तात्यासाहेब काळे, प्रताप बोरकर, रघुनाथ चौधरी, रामदास चौधरी, मिलापचंद गायकवाड, अशोक गायकवाड, सुभाष जगताप, जानकु कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी-माजी संचालक प्रकाश जगताप, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, आप्पासाहेब काळभोर, जिल्हा बँकेचे माणिक गोते, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, अनिल टिळेकर, अण्णासाहेब काळभोर, विठ्ठल शितोळे, योगेश काळभोर, राहुल घुले, सदस्य नागेश काळभोर, बाळासाहेब काळभोर, महिला गटात किरण काळभोर, भारती शेवाळे यांचा समावेश आहे.
कारखाना बंद पडलाच कसा?
पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हवेली तालुका, दौंड तालुका, खेड तालुका एवढे मोठे कार्यक्षेत्र असलेला व स्वतःच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन असलेला कारखाना बंद कसा पडू शकतो, हा सभासदांना गेली अनेक वर्षे पडलेला प्रश्न या निवडणुकीनंतर सुटणार का नाही ? हाच मोठा सवाल आहे. की असलेली जमीन विकण्यासाठीच ही निवडणूक घेण्यात येत आहे, अशी चर्चा सभासदांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. काही सभासदांनी या संदर्भात आपले मनोगत सोशल मीडियामध्येही शेअर केले आहे.