बारामती – बारामतीच्या इतिहासात प्रथमच सर्व बारामतीकर आपापल्या घरात असलेले आढळले. निर्मनुष्य रस्ते व कमालीची शांतता असे क्षण बारामतीने प्रथमच अनुभवले. बारामती थांबल्याचे रविवारी पाहायला मिळाले. रस्त्यावर अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर एकही वाहन आले नाही. अशी निरव शांतता बारामतीकरांनी प्रथमच अनुभवली.
बारामती शहरासह तालुक्यात रविवारी सकाळी सातपासून “जनता कर्फ्यू’च्या आवाहनास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोणीही घराबाहेरच पडले नाही, त्यामुळे रस्ते ओस पडलेले होते. करोनाच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून ही बाब बारामतीकरांनी खऱ्या अर्थाने आज मनावर घेतल्याचे दिसून आले.
कोणतेही संकट आले तर त्या संकटाला एकजूटीने सामोरे जाण्याची बारामतीची परंपरा आहे. आज करोनाच्या संकटावर मात करण्यासाठीही बारामतीकरांनी उत्स्फूर्त एकजूट दाखवित सर्व व्यवहार बंद ठेवण्यासह स्वतःला “होम क्वारंटाईन’ करून घेतले.
एरवी बंद, संप, मोर्चे यासह अनेक कारणांनी बारामती बंद राहिली, मात्र आजचा बंद खऱ्या अर्थाने इतिहासात नोंद व्हावी असाच होता. आज एकही बारामतीकर घराबाहेर पडला नाही आणि रस्त्यावर वाहन घेऊन उतरला नाही, त्यामुळे आज प्रथमच हॉर्नविरहीत बारामतीचा अनुभव आला. कधी नव्हे तो पक्ष्यांचा किलबिलाट आज प्रकर्षाने ऐकू येत होता.
नगरपालिकेचे कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी वगळता रस्त्यावर कोणीही दिसून आले नाही. रविवारी तशीही बारामतीत वर्दळ तुरळकच असते, मात्र पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे व करोनावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे या भावनेतून लोकांनी उत्स्फूर्तपणे घरातच स्वताःला क्वारंटाईन करून घेतले.