Bansuri Swaraj । भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तब्बल २८ महिला उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या महिला उमेदवाराच्या यादीतील एका नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झालीय. ते नाव म्हणजे बांसुरी स्वराज.
भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर भाजपनं या निवडणुकीसाठी त्यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी दिलीय. बांसुरी स्वराज या नेमक्या कोण आहेत. पक्षाने त्यांना यंदा का संधी दिली याविषयी माहिती जाणून घेऊ…
कोण आहेत बांसुरी स्वराज?Bansuri Swaraj ।
बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली बार कौन्सिलमध्ये त्यांनी २००७ मध्ये प्रवेश घेतला. दिल्लीत त्या मागच्या १६ वर्षांपासून वकिली करत आहेत. त्यांनी साहित्य हा विषय घेऊन वॉरवरिक विद्यापीठातून बी ए ऑनर्सचा कोर्स केलाय. तसंच त्यांनी लंडन येथील बीपीपी लॉ स्कूलमधून वकिलीचं शिक्षण घेतलं तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलंय.
भाजपाचे दिल्लीचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांना जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा बांसुरी स्वराज यांना भाजपाच्या कायदा विभागाच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलीय.
बांसुरी स्वराज कधी चर्चेत आल्या होत्या? Bansuri Swaraj ।
बांसुरी यांनी कायद्यात बॅरिस्टर म्हणूनही पदवी मिळवलीय. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या कायदेशीर संघाशी संबंधित असल्याबद्दल त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी बासुरी स्वराज चर्चेत आल्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या मुलीचा स्वतःचा व्यवसाय आहे, असे भाजपने तेव्हा आपल्या बचावात म्हटले होते. त्या सुषमा स्वराज यांच्या कन्या असल्या तरीही बांसुरी यांना त्यांचे काम आणि कार्यक्षेत्र निवडण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला होता. आता याच बांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.