सरकारी बॅंक कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : – बॅंकांच्या शाखांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी यंत्रणा नाही. बॅंकांचे सॅनिटायजेशन होत नाही. त्यामुळे कर्मचारी असुरक्षित झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असे बॅंक कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.
अन्यथा बॅंक कर्मचाऱ्यांना होणाऱ्या संसर्गात वाढ होण्याचा धोका निर्माण होईल असे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन या संघटनेने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी बॅंक प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला बॅंकातील सुरक्षा वाढविण्यासाठी सूचना कराव्यात असे मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
गृहमंत्रालयाने संसर्ग होऊ नये म्हणून जे सुरक्षाविषयक मानदंड जारी केले आहेत, त्या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे बॅंक प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने बॅंकांच्या सॅनिटायजेशन आणि गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. संघटनेने असाही आरोप केला आहे की, बॅंका गर्दी असलेल्या शाखांमध्ये गर्दीच्या नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक नेमत नाहीत. परिस्थिती जास्त बिघडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा.
मुंबई शहरातील विविध शाखातील 15 बॅंक कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावला आहे. शेकडो जणांना संसर्ग होऊन इस्पितळात जावे लागले आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर फार खराब आहे. आता खरिपाचा हंगाम चालू असल्यामुळे बरेच शेतकरी बॅंक शाखांमध्ये पीक कर्जासाठी
येत आहेत.
सुटीच्या दिवशीही काम
या संघटनेने असे म्हटले आहे, की रायगड, अलिबाग, पनवेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने आठवड्याच्या सुटीच्या दिवशी आणि इतर सुटीच्या दिवशीही बॅंकांचे कामकाज चालू ठेवण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्याना सलग काम करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला यासंबंधात निर्देश द्यावेत, असे या संघटनेने म्हटले आहे.