प्रशांत जाधव
सातारा – सरळ सेवा भरतीतून महावितरण कंपनीत जुलै 2019 मध्ये झालेल्या विद्युत सहाय्यक पदांच्या भरतीमध्ये दहावीचे बोगस गुणपत्रक सादर करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी मराठवाड्यातील गोकुळ साहेबराव चव्हाण (रा. कासोडा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे. दैनिक “प्रभात’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणने ही कारवाई केली असून, चव्हाण याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी महावितरणच्या कराड येथील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या “प्रकाशगड’ या मुंबईतील मुख्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे बोगस गुणपत्रिका प्रकरणी पुढील कारवाईचा चेंडू वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, महावितरण कंपनीने जुलै 2019 मध्ये सरळ सेवा परीक्षेतून राज्यात विद्युत सहाय्यक पदांची भरती केली होती. या भरतीत घोळ झाल्याचे आणि गोकुळ चव्हाणने दहावीची बोगस गुणपत्रिका भरतीवेळी सादर केल्याचे वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. याबाबत बुधवारी (दि. 19) दिवसभर विचारविनिमय करून अखेर गोकुळ चव्हाणला बडतर्फ करण्यात आले; परंतु हा विषय केवळ 2019 मधील भरतीपुरता मर्यादित नसून, 2014 सालातील भरतीमध्येही असाच प्रताप मराठवाड्यातीलच काही उमेदवारांनी केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
त्यावरही “प्रभात’ने आवाज उठवल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व संशयास्पद गुणपत्रकांची पडताळली सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या अतिशय गंभीर प्रकाराच्या मुळाशी जाण्याचा चंग महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधला आहे. त्या अनुषंगाने पत्रव्यवहार सुरू आहे. यासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत, म्हणून गोकुळ चव्हाण याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली, तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असा सल्ला कराड शहर पोलिसांनी दिल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. गोकुळ चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी “प्रकाशगड’ या मुख्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.
कराड पोलिसांनी झटकली जबाबदारी?
गोकुळ चव्हाणने सादर केलेली कागदपत्रे बोगस असल्याचे औरंगाबाद बोर्डाने कळवल्यावर महावितरणचे अधिकारी चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, कागदपत्रांची पडताळणी करणारे कार्यालय आमच्या हद्दीत नसल्याचे कारण पुढे करून, पोलिसांनी हात वर केले. त्यामुळे “प्रकाशगड’मधील अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर चव्हाण याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.