पुणे – राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मोठी अडचण ही अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांची होणार आहे. विशेष करून ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा आहे. त्यांचे विम्याचे पैसे रखडणार आहेत. असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.
ऐन दिवाळीच्या काळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच दरम्यान राज्यात निवडणुका होत्या. या निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली त्वरित करण्याऐवजी मुख्यमंत्री तसेच विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची बांधावर जावून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. सत्ता स्थापनेपेक्षा त्यांना त्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान महत्त्वाचे वाटले.त्यामुळेच त्यांनी थेट प्रत्यक्षात घटनास्थळी जावून नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते.
विमा कंपन्यांचे फावले
विमा कंपन्या या शेतकऱ्यांचा क्लेम नाकारत असल्यामुळेच सध्या अंसतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात काही राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन आंदोलने सुद्धा केली आहेत. या आंदोलनानंतर काही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले असले तरी अद्याप हजारो शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. राष्ट्रपती राजवटीमुळे विमा कंपन्यांचे आयते फावले आहे.