पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या आणि प्रमुख गणेशमंडळांनी मंडपातच उत्सव आणि मंदिर परिसरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दरवर्षीप्रमाणे डामडौल आणि देखावे नसले तरी उत्साह कमी झालेला नाही. मात्र, करोनामुळे “गणपती बसविता आला नाही’ म्हणून बाल गणेश मंडळातील छोटे कार्यकर्ते हिरमुसले आहेत. यंदा 90 टक्के बाल गणेशमंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केलेली नाही.
शहरात जवळपास चार हजार छोटी आणि बाल गणेश मंडळे आहेत. त्यांची नोंदणी पोलिसांकडे केली जात नाही. एखाद्या छोट्या गल्लीत किंवा सोसायटीच्या आवारात श्रींची स्थापना केली जाते. तर, नोंदणीकृत असलेल्या 3223 मंडळांपैकी 300 मंडळांनीही यंदा श्रींची प्रतिष्ठापना केली नाही. शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांसह तब्बल 3223 गणेश मंडळे पोलिसांकडे नोंदणीकृत आहेत.
शहरातील बहुतांश बालगणेश मंडळांचे स्वत:चे मंदिर नसते. एखादी गल्ली, चाळ किंवा सोसायटीतील हौशी शालेय आणि किशोरवयीनमुले एकत्र येऊन छोट्याशा मंडपात श्रींची प्रतिष्ठापना करतात. उत्सवाच्या अगोदर काही दिवस एकत्र येत स्वत:च्या कल्पना लढवत देखावे उभारले जातात. पालक किंवा सोसायटीतील नागरिकांबरोबरच, दुकानदारांकडून वर्गणी गोळा करुन उत्सव साजरा केला जातो. मोठ्या मंडळांच्या जोडीला बालगणेश मंडळांचाही उत्साह चांगलाच पहायला मिळतो. मात्र, यंदा करोणाच्या भितीने पालकांनी मुलांना घराबाहेर जाण्यास व एकत्र येण्यास केलेला मज्जावामुळे बालगणेश मंडळांता श्रींची स्थापनाच झालेली नाही.