पुणे – “संगीत स्वयंवर’ हे नाटक शृंगाररसप्रधान आहे. या नाटकाने नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या कारकिर्दीतील आदराचा काळ सुरू झाला, त्यांच्या भूमिकांना सोनेरी झळाळी मिळाली. त्या काळी बालगंधर्व यांनी अस्सल शालू, शेले, दागिने, परदेशातून आणलेले किमती अत्तर यांचा वापर केल्याने कलावंत आणि रसिकांमधील मनोवृत्ती प्रफुल्लीत होत. त्यामुळे हे नाटक श्रीमंत म्हणून प्रसिद्ध होते, असे प्रतिपादन बालगंधर्व रसिक मंडळीचे अध्यक्ष, ज्येष्ठ गायक-अभिनेते सुरेश साखवळकर यांनी केले.
संगीत नाटकाच्या निस्सिम चाहत्या श्रीमती विजयाताई देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ (दि. 12 मे) कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित “संगीत स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. डॉ. हिमानी तपस्वी यांची प्रमुख उपस्थिती होती. देशपांडे यांच्या कन्या आणि गद्य रंगभूमीवर 25 वर्षे कार्यरत असलेल्या अभिनेत्री अवंती बायस यांनी या प्रयोगाचे आयोजन केले होते.
“कलाद्वयी’ संस्थेची निर्मिती असलेल्या संगीत स्वयंवर या नाटकातील अवीट गोडीची आणि देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांनी संगीत दिलेली नाट्यपदे रसिकांना प्रदीर्घ कालावधीनंतर ऐकायला मिळाली. सूत्रसंचालन वर्षा जोगळेकर यांनी केले. आभार प्रियंका बायस यांनी मानले.