मुंबई : राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच केंद्राकडून तापास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपालादेखील त्यांनी यावेळी खोडून काढले. एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधानांच्या कृतीचे समर्थन केले असल्याचे पाहायला मिळाले.
विरोधकांकडून ईडी आणि सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांचा वापर भाजपाकडून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गैरवापर केला जातो असा वारंवारपणे आरोप करण्यात येतो. मात्र वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीही चुकीचं वागत नसल्याचे म्हटले आहे. एवढंच काय मी त्यांच्या जागी असतो तरीही असंच वागलो असतो. कायद्याच्या चौकटीत राहून जे करायचं तेच मोदी करत आहेत. मी नरेंद्र मोदींच्या जागी असतो तरीही हेच केले असते असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची खुर्ची हवीच आहे. कायदेशीर मार्गाने ती वाचवणं यात काहीही चुकीचं नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. कुणीही सत्ता राखण्यासाठी तेच करतं जे आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपला एक परखड सवाल देखील केला. यावेळी सामान्य माणसांनी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की २०१२ पासून काही षडयंत्रं सुरू आहेत. पक्षांमध्ये भांडणं लावली जात आहेत असं माझं निरीक्षण आहे. एक लक्षात घ्या माणसाचा भरवसा नसतो. भाजपा किंवा संघाने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. माझी इच्छा नाही की असं व्हावं पण उदाहरण म्हणून घ्या की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या काही झालं? तर पुढचा पंतप्रधान कोण असेल हे सांगतील का? त्यांना सांगता येणार नाही. अशात आमच्याकडे विचाराल की पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? आमच्याकडेही कुणालाही सांगता येणार नाही. असे सांगत राजकारणात काही गोष्टी परिस्थितीनुसार घडत असल्याचे म्हटले आहे, त्याच बरोबर मला उद्या भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर मी जाऊ शकतो. एक तर माझा पक्ष मला अडवू शकतो किंवा माझे कुटुंबीय मला अडवू शकतात. तिसरी अशी कुणीच व्यक्ती नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
एक लक्षात घ्या भाजपाला ती प्रत्येक संधी हवी आहे ज्या ठिकाणी त्यांना फूट पाडता येईल. भाजपाकडून जे काही केलं जातं आहे ते काही चुकीचं नाही. राजकीय खेळाचा तो एक भाग आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मी पाहात आलो आहे की सत्ता आली की सत्तेवर येणारा पक्ष असंच वागत असतो. राजकारणात किंतू-परंतू यांना काहीही अर्थ नसतो. असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. विरोधक एकत्र आले तर ते खुर्चीखाली आग लावतील हे सत्य आहे. मग पंतप्रधान म्हणून मी हे का करू देऊ? विरोधकांना दूर ठेवण्याचा त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न मोदींकडून केला जातो आहे. मला यात काहीही चुकीचं वाटत नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच मी माझी प्रांजळ मतं मांडतच राहणार असेही त्यांनी म्हटले आहे.