आज मराठी रंगभूमी दिन : शिक्षण आराखड्यात कलेला वाव आवश्यक
– कल्याणी फडके
पुणे – सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याला नाटकांची जुनी परंपरा आहे. रसिकांना नाट्यगृहाकडे खेचणारी दर्जेदार नाटके आजही पाहायला मिळतात. तुलनेत बालनाट्यांची संख्या कमी होत आहे. दर्जेदार नाटकांतून मुलांवर संस्कार घडतात. त्यामुळे पालकांचा ओघ बालनाट्यांकडे असायचा. मात्र, मुलांचा बदलता आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बाल रंगभूमीच्या प्रेक्षकवर्गाबाबत अनेकदा साशंकतादेखील व्यक्त करण्यात येते. काही वर्षांपूर्वी शाळा आणि विविध संस्थांमार्फत बालनाट्य वर्ग आयोजित केले जात होते. याद्वारे कलावंतांना वाव मिळत होता. मात्र, आता ही शिबिरे केवळ सुट्टीपुरतीच मर्यादित असल्याचे चित्र आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमीचा घेतलेला आढावा.
नाट्य प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन यामध्ये 40 वर्षांहून अधिक काळ काम करणारे प्रकाश पारखी सांगतात, “नाटक हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रमुख साधन आहे. नाट्य प्रशिक्षण भाषेचा अधिक विकास होतो, मराठी वाचनाची आवड निर्माण होते. बालनाट्यांचा विचार केल्यास विद्यार्थ्यांची मराठी भाषा सुधारते. राष्ट्रीय शिक्षण आराखड्यामध्ये कलांना 40 टक्के महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या शिक्षण आराखड्यामध्ये देखील महत्त्व देणे आवश्यक आहे. नाटक हे सर्व कलांचे एकत्रित मिश्रण असल्याने अग्रक्रमाने अभ्यासक्रमांमध्ये नाट्यशास्त्र हा विषय घेणे आवश्यक आहे.
शाळांमध्ये विशेष नाट्य शिक्षक असावा
“सीबीएसई’च्या शाळांमध्ये “नाटक’ हा विषय निवडता येतो. मात्र, राज्य मंडळाच्या शाळांमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. “एसएससी’ शाळांमध्ये ज्या शिक्षकांना नाटकातील ज्ञान आहे, त्या शिक्षकांना नाटक बसवण्याचे काम देण्यात येते. तर अनेक ठिकाणी कलाशिक्षकांकडे ही जबाबदारी सोपवण्यात येते. प्रत्येक शाळेमध्ये चित्रकलेसाठी वेगळा शिक्षक आहे. परंतु नाटकासाठी वेगळा शिक्षक नाही, याची खंत नाट्य अभ्यासकांनी व्यक्त केली.
पूर्वीपेक्षा बालनाट्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सुदैवाने पुण्यामध्ये आजही बालनाट्ये पाहायला मिळतात. त्यांची निर्मिती होत आहे. मात्र तिकीट बुकिंग कमी झाले आहे. जाहिरातींच्या माध्यमातून नाटकांची प्रसिद्धी होत असल्याने नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि “हाऊसफुल्ल’ देखील होत आहेत. स्पर्धा आणि “रिऍलिटी शो’मुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे.
– दीपक रेगे, प्रमुख कार्यवाह, बालरंगभूमी परिषद
बालनाट्यांमुळे संस्कारक्षम पिढी घडत आहे. परी, राक्षस या बालनाट्यांतील पात्रांसह आता समाजातील विषयदेखील नाटकांतून पाहायला मिळत आहेत. नव्याने नाट्यक्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगले व्यासपीठ मिळते. शाळांमध्येदेखील नाट्यविषयक उपक्रम, स्पर्धा होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव मिळत आहे. सध्या मुले आवर्जून बालनाट्य पाहायला जातात. मुलांना स्वत:हून नाटकांमध्ये सहभागी होण्याची आवड निर्माण होत आहे. अधिकाधिक दर्जेदार बालनाट्यांची निर्मिती झाल्यास बाल रंगभूमीला नक्कीच चांगले दिवस येतील.
– निवेदिता मेहेंदळे, नाट्य लेखिका
रविवारी नाट्यगृह न मिळणे ही सध्या नाट्यनिर्मिती संस्थांसमोरील सर्वांत मोठी अडचण आहे. आठवड्यातील इतर वारी नाटकांचे प्रयोग ठेवल्यास प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रामुख्याने रजा काढून मुलांना बालनाट्ये दाखवणे, ही मानसिकता अजून पालकांमध्ये नाही. त्याचबरोबर सध्या हे जाहिरातींचे युग आहे. जाहिरातींच्या खर्चाशी नाट्य प्रशिक्षण संस्थांचे गणित जुळत नाही. त्यामुळे दर्जेदार विषयांवर आधारित बालनाट्ये असूनदेखील अपेक्षित प्रेक्षक येत नाहीत. जाहिरातींच्या खर्चामुळे नाटकांचे दर वाढतात. पर्यायाने मध्यमवर्गीय प्रेक्षकवर्ग नाटकांना येऊ शकत नाही.
– प्रकाश पारखी, अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद