मुंबई – प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावे, असे सांगितले होते. आता बच्चू कडू यांनी कुणासोबत सौदा केला, काय केले, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला.
बाकीच्या आमदारांसोबत काय झाले हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सगळे जण गेले होते. रवी राणा यांची समजूत काढली. दोघांनीही मान्य केले की आम्ही रागामध्ये बोललो. त्यामुळे दोघांनी आता विकासासाठी काम करण्याचे ठरवले आहे. आता सरकारला अडचण निर्माण होईल, असं कोणतीही काम ते करणार नाही. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर पडदा पडला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.