नवी दिल्ली -प्राप्तिकरदात्यांचा अधिकाऱ्यांशी थेट संबंध न येता कामकाज करण्याची फेसलेस पद्धत सुरू करण्यात येणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पी. सी. मोदी यांनी देशभरातील प्राप्तिकर अधिकाऱ्यांबरोबर वेबिनारच्या माध्यमातून चर्चा केली.
त्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर कसलाही परिणाम होणार नाही. त्यामध्ये थोडीशी अदलाबदल करावी लागणार आहे. बाकी या विभागाच्या दैनंदिन कामकाजात फारसा फरक पडणार नाही, असे मोदी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर नवीन योजना काय आहे, तिचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत याची माहिती यावेळी देण्यात आली.
ही नवी पद्धत इतक्या वेगात अंमलात आणली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे, असे अधिकाऱ्याच्या संघटनेने प्राप्तिकर विभागाला कळविले होते. त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आणि काम करण्याच्या स्थळावर परिणाम होणार असल्याचे हे या पत्रात म्हटले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. सुरुवातीला ही पद्धत वीस शहरांत राबविण्यात येणार आहे.
मनुष्यबळ कमी होणार नाही
फेसलेस तपासणीची पद्धत लागू केल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या मनुष्यबळाच्या संख्येवर कसलाही परिणाम होणार नाही किंवा या अधिकाऱ्यांना उपलब्ध करण्यात आलेल्या विविध स्रोतावरही परिणाम होणार नाही. या पद्धतीमुळे कर विभागाची जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती उजळ करण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.