मुंबई – रोहित शर्मा न ईशांत शर्मा यांची पुढील महिन्यात फिटनेस चाचणी होणार असून त्यानंतरच त्यांच्या भारतीय संघातील सहभागीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अर्थात, या दोघांबाबत फिजीओंचा अहवाल विपरीत असल्याचे संकेत मिळत असल्याने या दोन्ही खेळाडूंना संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाच मुकावे लागणार असल्याचेही सांगितले जात आहे.
आजपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यानंतर टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या दोन मालिका पार पडल्यावर 17 डिसेंबरपासून बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
त्यापूर्वी 11 डिसेंबरला या दोन्ही खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार असून त्यात दोघे फिट ठरले तरच त्यांचा संघ निवडीसाठी विचार केला जाणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर त्यांना विलगीकरणात किती दिवस राहावे लागणार आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने त्यांच्या सहभागावर संभ्रम निर्माण झाला आहे. जर विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसांचाच राहिला तर तंदुरुस्त ठरूनही त्यांना या मालिकेला मुकावे लागेल.
रोहित व ईशांत यांना भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले नव्हते त्यावरून प्रचंड टीका सुरू झाली होती. मात्र, कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर या दोन खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, तरीही ते पूर्ण फिट असल्याचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने त्यांच्या संघातील निवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
11 डिसेंबर रोजी रोहित शर्मा आणि ईशांत शर्माची फिटनेस चाचणी होणार आहे. यामध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.