नवी दिल्ली : सर्वांसाठी रस्ते सुरक्षित करण्याबाबतच्या प्रतिबद्धतेचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुनरुच्चार केला आहे. रस्ते सुरक्षेबाबत अधिकाअधिक जागृती करुन रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरुच राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.
ते आज नवी दिल्ली येथे रस्ते सुरक्षेसंदर्भात एका परिषदेला संबोधित करत होते. रस्ते अपघात एकात्मिक माहिती (आयआरएडी) मुळे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींवर आधारित विश्लेषणात्मक क्षमतांमध्ये वृद्धी होईल तसेच अपघातस्थळ आणि अपघातप्रवण क्षेत्रावर करावयाच्या सुधारणा, उपाययोजनांबाबत विश्लेषणातही साहाय्य मिळेल.
अपघातासंदर्भातील माहिती-आकडेवारी गोळा करण्यासाठी विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागांना 30 हजारांहून अधिक टॅब पुरवण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. 2018 मध्ये जवळपास 1.5 लाख व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
आपल्या देशात नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादी घटनांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येपेक्षा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बहुतांश रस्ते अपघात आणि मृत्यू प्रमाणापेक्षा अधिक वेगाने होत असतात. अपघात झालेल्यांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन सिंह यांनी नागरिकांना केले आहे.
रस्ते सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले तसेच वाहन चालवताना टीव्ही, मोबाईल यांचा वापर टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला.
रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ते अपघात एकात्मिक माहिती (आयआरडीए) या नव्या प्रकल्पाचा आरंभ सिंह आणि गडकरी यांच्या हस्ते झाला.