संध्याकाळ होऊन गेली आहे. दिवेलागणी झाली, तरीही मी टेरेसमध्ये बसले आहे, एकटीच! दूरवर बघत. सूर्य केव्हाच अस्ताला गेला आहे. क्षितिजाची लाली कमी होऊन त्यात जांभळट काळपटपणा येत आहे. कधी आकाशात ढग भरून आलेले असले की हा रंगांचा खेळ दिसत नाही. सूर्य कधी बुडाला ते कळतही नाही. आज मात्र हा रंगांच्या उधळणीचा खेळ चालू आहे. मानवी जीवनातील रंग फिकट झाले तरी हे निसर्गाचे रंग मात्र तसेच टवटवीत, तजेलदार राहतात.
अशा संध्याकाळी टेरेसमध्ये बसले की मला कोकणातील सागर किनाऱ्यावरची संध्याकाळ आठवते. नजर पोहचते तिथपर्यंत दिसणारा तो चमकदार सागर, त्यात तरंगणारी-वरखाली होणारी ती कोळ्यांची होडी आणि सुळक्यासारखा असणारा समुद्रातील तो एकच खडक. ध्यानस्थ बसलेल्या एखाद्या योग्यासारखा वाटत असे. आजूबाजूला चाललेला लाटांचा खेळ निर्विकारपणे पाहणारा. आम्हाला मात्र लाटांशी खेळायला आवडत असे. किनाऱ्याला आवेगाने आलेली लाट मागे परत जाताना पायाखालची रेतीही घेऊन जाताना तळपायाला मोठ्या गुदगुल्या होत असत. आता तेथे गेले तर पुन्हा ती अनुभूती येईल का? कारण पायाखालून लाटांबरोबर सरकणाऱ्या रेतीमुळे होणाऱ्या त्या गोड गुदगुल्यांची जाणीव होण्याइतके आता तळपायही तेवढे संवेदनशील राहिलेले नाहीत.
लहानपणीची आणि नंतर सुटीत भावाकडे जात असे तेव्हाही सागर किनाऱ्याची ती उत्साही संध्याकाळ मनात फेर धरते. सूर्य समुद्रात बुडाल्यानंतर अंधार पडणार आहे, हे माहीत असूनही ती संध्याकाळ पाहण्यात, समुद्राच्या ओलसर रेतीत आपल्या माणसांच्या सहवासात रमतगमत-गप्पा मारत फिरताना मोठा आनंद वाटत असे. त्या केवळ आठवणींनी मन आजही उल्हसित होते. मनाचे पाखरू तिकडे झेप घेऊ पाहते. डोळे मात्र समोर दिसणारे पक्ष्यांचे थवे पाहत आहेत.
उन्हाळा असो, पावसाळा असो वा हिवाळा; संध्याकाळच्या छायाप्रकाशात आपापल्या घरट्यांकडे जाणाऱ्या पक्ष्यांचे थवे दिसत राहतात. काही पक्ष्यांचे खेळही चालू असतात.
संथपणे घिरट्या घालण्याचे… ते खेळ पाहताना एक गोष्ट लक्षात येते, की हे पक्षी पंखाची काही वेळ हालचाल करून थोडा वेळ संथपणे तरंगतात आणि पंखांची हालचाल करत पुन्हा भरारी घेतात. तशी ही फार छोटी आणि साधी घटना. पण विचार करायला लागले तर त्यातून आपल्याला बरेच काही शिकता येते. आयुष्यात आणि दिवसभरच्या घाई गडबडीतील कामातून थोडा वेळ आराम. परत थोडा वेळ काम, परत आराम, असे केल्याने थकवा येत नाही, दमछाक होत नाही. पण आपण ती गोष्ट शिकत नाही. तारुण्यात जिवापाड काम करतो आणि उतारवयातील आरामाचा विचार करतो. पण तो आराम मिळतोच असे नाही. आणि समजा (चुकून) मिळाला तरी तो सततचा आराम नकोसा वाटतो. नाही म्हटले तरी आजूबाजूला कितीही, अगदी आपली म्हणावी अशी माणसे असली तरी एकाकीपणा जाणवतो. संध्याकाळच्या वेळी. अगदी
ढळला रे दिन ढळला सख्या
संध्याछाया भिवविती हृदया
असे वाटले नाही, तरी एकाकीपण जाणवते. विचार केला तर आपले आयुष्य हाही एक दिवसच आहे. आपले बालपण म्हणजे सकाळ. बालपण असते-अगदी सकाळ सारखं कोवळं, स्वच्छ, नितळ, निष्पाप आणि ताजं. पुढे येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची तयारी करणारे. आयुष्याचा पाया म्हणजे बालपण.आणि तारुण्य म्हणजे दुपार. तरुण तडफदार, उमेदीचा काळ. जी काय हालचाल करायची ती याच वयात आणि वेळेत. संध्याकाळसाठीची पुंजी गोळा करायची-पुंजी केवळ पैशांची नाही, तर सुहृदांची-आठवणींची…
सकाळ – दुपार, बालपण – तरुणपण कधी सरले कळतही नाही. पण प्रश्न येतो तो संध्याकाळी. कधी कधी ही कातरवेळ बेचैन करते. सूर्यास्त पाहताना बेचैन वाटते. आयुष्याचा सूर्यही आपल्या देखतच काळोखात जाणार असतो. आपण हतबल होऊन बसण्याखेरीज काहीच करू शकत नाही.
विचार येतो, तो दिवसभर- सकाळपासून केलेल्या गोष्टींचा. त्यात बऱ्याच सुखद, काही विषण्ण करणाऱ्या… दिवसभर केलेल्या मेहनतीचा, आयुष्यभर केलेल्या धडपडीचा थकवा शरीरावर आणि मनावर जाणवू लागतो. जगलेल्या आयुष्याचा हिशेब करायचा. त्यात काय चूक आणि काय बरोबर यांची बेरीज-वजाबाकी करायची. सगळीच गणितं बरोबर असतात असंही नाही. म्हणून संध्याकाळी देवापुढे सांजवात लावायची. तिचा स्निग्ध, मंद प्रकाश उभारी देतो. देवापुढे हात जोडायचे आणि म्हणायचे, शुभं करोति कल्याणम…
अनुराधा पवार