उत्तम पिंगळे
आज वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. उद्यापासून सन 2020 सुरू होणार. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत 2020 सुपर पॉवर म्हणावा तसा अवतीर्ण झालेला नाही. कारण सुपर पॉवर म्हणत असताना केवळ टेक्नॉलॉजीमध्ये आपण आत्मनिर्भर होऊन चालत नाही तर एकूणच देशात कायदा व सुव्यवस्था, समान संधी व पर्याप्त उद्योग रोजगारासाठी आवश्यक आहेत. प्रत्येक व्यक्तीला जर वाटत असेल की मला या देशात मानाने जगणे शक्य आहे तसेच माझ्या कुटुंबालाही सुखी ठेवण्यासाठी पर्याप्त संधी आहेत, तरच खऱ्या अर्थाने डॉ. कलाम यांना अभिप्रेत असलेला भारत बनला आहे, असे आपण म्हणू शकतो.
मागील वर्षाचा लेखाजोखा पाहताना एकूणच वातावरण बदलून गेलेले आहे. पहिले खरेखरे वातावरण ज्यात पावसाने सर्वत्र अगदी नोव्हेंबरपर्यंत थैमान घातले व लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. पूरजन्य परिस्थितीमुळे अब्जावधींचे नुकसान झाले. कित्येक राज्यांत शेकडो मृत्युमुखी पडले. अर्थात निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही, पण याला एकूण आपणच जबाबदार आहोत. सरकारने परोपरीने नुकसानीबाबत यथायोग्य मदत जारी केली जेणेकरून या परिस्थितीत जे अडकले त्यांचे पुनर्वसन सुकर व्हावे. हळूहळू देश यातून बाहेर पडू लागलेला आहे.
दुसरीकडे राजकीय बाबतीत 370 कलम रद्द केले हा एक असामान्य निर्णय होता. हळूहळू काश्मीरही यातून बाहेर पडेल. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टानेही आपला निर्णय दिलेला आहे. सामाजिक बाबतीत सरकारने बहुमताच्या जोरावर सीएए व एनआरसी बिल पास केले आहे पण जनतेला विश्वासात न घेतल्याने विरोधक व आता जनता रस्त्यावर येत आहे व सामाजिक वातावरण ढवळून गेले आहे. आर्थिक बाबतीत मंदीच्या झळा लागत असून अनेक कारखान्यांनी ले ऑफ व नोकर कपात केली आहे. मार्केट नसल्याने उत्पादन कमी होत आहे. पर्यायाने रोजगारही कमी होत आहे. सरकारने कंपनी कर व जीएसटीमध्ये बदल करून या परिस्थितीवर मात करणे चालू केले आहे. बॅंकांनाही अधिक भांडवल पुरवून नवीन स्टार्टअपना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. पण याचे परिणाम यायला काही वेळ जावा लागेल.
आज मेक इन इंडिया व स्टार्टअपसाठी देशातील सामाजिक वातावरण पहिले चांगले असणे आवश्यक आहे. भारताने जगात नाव कमावले आहे. प्रधानमंत्र्यांच्या विविध दौऱ्यातून अनेक देशांशी आपली मैत्री अधिक दृढ झाली आहे. असे असताना परकीय गुंतवणूक म्हणावे तशी का वाढत नाही? अगदीच वाढ नाही असे नाही पण एवढ्या महाकाय अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड भांडवलाची गरज आहे जेणेकरून नवीन उद्योग येतील मग ते कोणत्याही प्रकारातले असो. ते वाढतील तर रोजगार वाढेल मागणी वाढेल. पण म्हणावा तसा वेग अजून पकडलेला नाही.
सरकारनेही यातून बोध घेऊन नव्या 2020 सालामध्ये क्रिकेटच्या ट्वेन्टी 20 मध्ये जशी धावांची बरसात करतात त्या प्रमाणेच रोजगार, उद्योग व विकास या धावांची वेगाने जमवाजमव करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तसे करतानाच जातीयवाद, धर्मवाद, भ्रष्टाचार व अराजकता या गुगलींपासून सावध राहणे आवश्यक आहे. नववर्षात सर्वांनी आशावादी राहावे.