नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. त्या निकालांनी भाजपचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले. त्या पक्षाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांची सत्ता राखली. तर, आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार मुसंडीने पंजाबमध्ये सत्ताबदल घडवला.
दिल्लीनंतर पंजाबची सत्ता काबीज करून राष्ट्रीय पातळीवर आगेकूच करण्यास सज्ज असल्याचा राजकीय इशारा आपने इतर पक्षांना दिला आहे. आताचे निकाल कॉंग्रेसच्या दृष्टीने सर्वांत धक्कादायक ठरले आहेत. पंजाबची सत्ता गमवावी लागल्याने त्या पक्षाच्या हाती आणखी राजकीय पीछेहाट आली. निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या इतर राज्यांतही कॉंग्रेसच्या पदरी निराशाच पडली.
ताज्या निकालांतून तीन प्रमुख निष्कर्ष पुढे येतात. भाजपचा राजकीय दबदबा कायम, कॉंग्रेसची राजकीय घसरण सुरूच आणि आपमुळे देशाच्या राजकीय नकाशात बदलाची शक्यता हे ते निष्कर्ष. संबंधित विधानसभा निवडणुकांकडे दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले गेले. त्या निवडणुकांचे निकाल पाहता देश पातळीवर भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांना आपली ताकद आणखी वाढवावी लागणार असल्याचे सूचित होत आहे.