नवी दिल्ली – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी आचारसंहित भंग केल्याचा आरोप सिद्ध होत असून त्यांनी या प्रकरणात माफी मागावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने त्यांना केली आहे.
तथापि, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांना याहीपेक्षा कडक शिक्षा या प्रकरणात द्यायला हवी होती, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. आता मुख्यमंत्रीच दोषी ठरल्याने भारतीय जनता पक्षाने आसामातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटर अकौंटवर ही मागणी केली आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्याबद्दल त्यांना केवळ इशारा देऊन आयोगाने सोडून दिले आहे. मुख्यमंत्री शर्मा यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना प्रचार करण्यास बंदी घालावी, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे.