ढाका – उपांत्य फेरीत जपानकडून आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत आशियाई चॅम्पियन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला 4-3 ने धूळ चारली. याच स्पर्धेत भारताने साखळी फेरीच्या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव केला होता.
या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुमीत सिंग, वरुण कुमार आणि आकाशदीप सिंग यांनी गोल केले. पाकिस्तानकडून अरफाज, अब्दुल राणा आणि नदीम या खेळाडूंनी गोल केले. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने संघाचे उत्तम नेतृत्व करत सामनावीराचा किताबही पटकावला.
भारतीय संघाने सुरूवातीपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व राखले. पहिल्या सत्रापासून भारताने आक्रमक सुरुवात केली. लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचे सोने करत हरमनप्रीतने पहिल्या सत्रात पाकिस्तानला 1-0 ने पिछाडीवर ढकलले. यानंतर पाकिस्तानच्या अरफाजने भारताच्या बचावफळीतील गलथान खेळाचा फायदा घेत संघाला 1-1 अशी बराबरी मिळवून दिली.
उत्तरार्धात 33व्या मिनिटाला अब्दुल राणाने पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. पण 45व्या मिनिटाला सुमीत सिंगने भारताला पुन्हा बरोबरीत आणले. शेवटच्या 15 मिनिटात खेळ अधिकच रंगत गेला. 53व्या मिनिटाला वरूण कुमार, तर 57व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल करत भारताला आघाडीवर नेले.
अवघ्या काही सेकंदातच पाकिस्तानच्या नदीमने एक गोल करत गोलमधील अंतर कमी केले. पण खेळ संपेपर्यंत भारताने पाकला गोल करू न दिल्याने अखेर भारत 4-3ने विजयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, उपांत्य लढतीत भारतीय संघाला जपानकडून 5-3 असा पराभव पत्कारावा लागला होता.