नवी दिल्ली :- कृत्रिम बुद्धिमत्ता ही रोजगार निर्मितीस मारक ठरेल असे सांगितले जाऊ लागले आहे, पण प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही, उलट कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतात अधिक नोकऱ्या निर्माण होतील. या नव्या तंत्रज्ञानामुळे कमी कौशल्य किंवा कौशल्य नसलेल्या अधिक लोकांना उच्च स्तरावरील नोकऱ्या निर्माण होऊ शकतात असे बी20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
ते आज येथे एका परिसंवादात बोलत होते. चंद्रशेखरन हे टाटा सन्स कंपनीचे अध्यक्षही आहेत. ते म्हणाले की, भारताने तांत्रिक-कायदेशीर दृष्टीकोन घेऊन डेटा गोपनीयता आणि संरक्षणासाठीच्या कार्यातही”विलक्षण प्रगती” केली आहे ही समाधानाची बाब आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनाने नव्या रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ती शंका दूर करताना ते म्हणाले, उलट या तंत्रामुळे भारतासारख्या देशात अधिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात, कारण हे तंत्रज्ञान कमी कौशल्य किंवा कोणतेही कौशल्य नसलेल्या लोकांना सक्षम बनवेल. त्यांना माहिती कौशल्याने सक्षम केले जाईल त्या आधारे त्यांनाही मोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या मिळू शकतात.
चंद्रशेखरन म्हणाले की कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभाव वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आणि समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल.
ते म्हणाले की वृद्ध नागरीकांना देखील दीर्घायुष्याचा सामना करावा लागणार आहे आणि या सर्व लोकांची काळजी घेणे आवश्यक आहे आणि या लोकांना आधार देण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रदान करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्राने ही समस्या सोडवता येऊ शकते.