- स्मशानभूमीच्या स्वच्छता, माळीकामासाठी ठेका;
- कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरावर करोनाची दहशत असताना महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीच्या स्वच्छता, माळीकाम, देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या ठेक्याचे नवे आदेश काढत या कामासाठी दीडशेहून अधिक कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश फर्माविले आहेत. एका बाजूला महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 5 टक्क्यांवर आणली असताना या अधिकाऱ्याने केलेल्या पराक्रमामुळे आश्चर्य व्यक्त होत असून संबंधितांचे “डोकं’ ठिकाणावर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील स्माशानभूमींची साफसफाई, देखभाल दुरुस्ती, सरक्षा आणि माळीकाम केले जाते. या कामांचा शहरातील विविध ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. “करोना’च्या पार्श्वभूमीवर या ठेकेदारांकडील अनेक कामगार गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गायब झाल्याचे समोर आले आहे. तर राज्य आणि केंद्र शासन अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये, असा आग्रह धरत आहे. शहरात करोनाच्या संशयास्पद रुग्णांची संख्या वाढत असून दीड हजारांहून अधिक जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
एका बाजूला अत्यंत गंभीर स्थिती असताना आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी शुभम आणि जय भवानी या दोन ठेकेदारांना शहरातील स्मशानभूमींची साफसफाई, देखभाल दुरुस्ती, सरक्षा आणि माळीकाम करण्याचा ठेका दिला आहे. तसेच आजपासून (1 एप्रिल) सर्व कामे करण्यासाठी ठेकेदाराने कामगारांना हजर करावे, असे निर्देश दिले आहेत. एका ठेकेदाराकडे किमान 80 ते 100 मजूर काम करत असून या दोन्ही ठेकेदारांचे मजूर बाहेर पडणार आहेत. करोनाची पार्श्वभूमी, महापालिकेतील कर्मचारी कपात, शहरातील दहशतीचे वातावरण असा प्रकार असताना रॉय यांनी केलेल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
केवळ आर्थिक लागेबांधे?
सध्या करोनामुळे शहरात दशहतीचे वातावरण आहे. शहराबाहेरून कामासाठी आलेले हजारो जणांनी यापूर्वीच शहर सोडले आहे. कामगार बाहेर पडण्यास धजावत नसतानाही दिलेला ठेका हा केवळ आर्थिक हित साधण्यासाठीचाच दिला असल्याचा आरोप होत आहे. कर्मचारी अनुस्थित असतानाही उपस्थिती दाखवून महापालिकेच्या पैशांची लूट करण्यासाठीच हा आदेश दिल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
प्रतिक्रिया नाही
या प्रकाराबाबत आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांना अनेकवेळा फोन करूनही त्यांनी फोन घेतला नाही. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना फोन बंद लागला. आयुक्तांना मॅसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी प्रतिक्रिया मिळू शकली नाही.