प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – रिक्षाचालकांच्या मनमानीला कंटाळून अनेकांनी खासगी कॅब सेवेला प्राधान्य दिले आहे. परंतु आता खासगी कॅब कंपन्या आणि चालकांची देखील मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जास्त पैसे आकारणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब न मिळणे, असे प्रकार सुरू झाले असून याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
दुसरा शनिवार, रविवार, स्वातंत्र्य दिन, पारशी नूतनवर्ष अशा जोडून आलेल्या चार सुट्यांमुळे पर्यटनासाठी शहर परिसरात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. पीएमपीची वाहतूक यंत्रणा मर्यादित आहे. त्यामुळे काही नागरिकांनी मोबाइल ऍपच्या माध्यमातून प्रवासी सेवा देणाऱ्या खासगी कॅब चालक कंपनीच्या रिक्षा आणि चारचाकी बुक केल्या. या कंपन्यानी प्रवाशांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत मनमानी पद्धतीने पैशांची लूटमार केली. प्रवाशांकडून कंपन्यानी पीकअप चार्जेसच्या नावाखाली 20 ते 30 रुपयांची लूट केली. तसेच काही कॅब चालक गर्दीच्या मार्गावर जाण्यासाठी नकार देत असल्याने नागरिकांचे हाल झाले.
शहरात अशा खासगी कॅब चालक कंपन्यांची मोठी संख्या आहे. सध्यस्थितीत शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. जोडून आलेल्या सुट्यांमुळे नागरिक घराबाहेर पडले होते. याचाच गैरफायदा घेत शहरातील कॅब चालक आणि रिक्षा चालकांनी मनमानी पद्धतीने चार्जेस घेतले. ज्यादा चार्जेस घेणाऱ्या या वाहन चालकांवर नियंत्रण आणण्यासाठी पाच वर्षापूर्वी परिवहन विभागाने नियमावली तयार केली होती.
यासाठी विधान मंडळात कायदा करणार असल्याची घोषणा तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे प्रवाशांची आर्थिंक लूट होत आहे.
नियमावली फक्त कागदावरच
सरकारने तयार केलेल्या नियमावलीत किलोमीटरसाठी दर निश्चित करून देण्यात आले होते. तसेच, या वाहनांना एक विशिष्ट रंग दिला जाणार होता. या कॅबवरील चालकांनी मनमानी पद्धतीने दर आकारल्यास त्यांच्यावर कारवाईचे अधिकार प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ला देण्यात आले होते. तसेच, जास्त भाडे आकारण्याबरोबरच उध्दट वर्तन अशा काही तक्रारी आल्यास परवाना देखील रद्द करण्याची तरतूद त्या नियमावलीत करण्यात आली होती. चालक, मालकांची खरी माहिती देणे, वाहनांचे फिटनेस, विमा, प्रवासी सुरक्षा, तंत्रज्ञानाचा वापर अशा गोष्टी त्यामध्ये होत्या. मात्र, सरकारच्या उदासिनतेमुळे या नियमावलीचे पुढे काहीच झाले नाही. याबाबत परिवहन विभागाची काही महिन्यांपूर्वी बैठक झाली आहे. अद्याप तरी या कॅब चालक कंपन्यांवर ठोस नियंत्रण आणण्यात शासनाला यश आलेले नाही.
माझा मार्केटिंगचा जॉब आहे. रोज कामानिमित्त शहरातील विविध ठिकाणी फिरतो. त्यामुळे बऱ्याच वेळा मला खासगी कॅब बुक करावी लागते. खासगी कॅब बुक केल्यानंतर बऱ्याच वेळा रिक्षा किंवा ऑटोपेक्षा अधिक पैसे घेतल्याचा अनुभव आला आहे.
-राम शिंदे, प्रवासी
माझे ऑफिस येरवडा येथे आहे. या मार्गावर खूप कोंडी असते, पावसाळ्यात बहुतेक जण कॅबलाच प्राधान्य देतात. परंतु कॅबचालक गर्दीत जाण्यासाठी तयार होत नसल्याने ऍपवर राइड कन्फर्म होत नाही.
– महिला प्रवासी, सिंहगड रस्ता