मला ना तेव्हा खूप आनंद होतो, जेव्हा मला कोणी समवैचारिक भेटतो. मग त्यात वयाचा प्रश्न नाही. नवीन मित्र किंवा मैत्रीण भेटणार म्हणलं की मला हरखून जायला होतं. आपले विचार, मत शेअर करण्यासाठी कोणीतरी सोबत आहे हा विचारच किती मस्त आहे ना. मला नेहमीच काहितरी बोलायचं असतं, ऐकायचं असतं, प्रतिसाद द्यायचा असतो.
जसं की एखादं छोटूकलं रानफूल, त्याचे सकवार रंग, त्याच्याभोवती भिरभिरणारी इवलाली फुलपाखरं, एखादी निवांत संध्याकाळ, धुक्याची दुलई आणि कॉफीचे दर्वळ किती सहजतेनं आवडून जातात. एखादाच क्षण असतो या सार्या घटनांना सामोरं जाण्याचा तरी त्या गोष्टी प्रचंड आवडून जातात. मनात घर करतात. तसंच काहीसं जुळलेल्या मैत्राचं असतं. जितकं सहज तितकंच जपलं तर सरळ आणि हवंहवंसं. अगदी थोड्या अवधीत ओळख होते. विचार, आवडी-निवडी जुळतात आणि मैत्रीचे रेशिमबंध विणले जातात. त्यासाठी वय, भाषा, आर्थिक विभिन्नता कशाचीच आवश्यकता वाटत नाही. असेच मैत्र टिकते. फुलते आणि आपला परिघ वाढवते.
गुलमोहर फुलल्यानंतर त्याच्या पाकळ्या लाल-गुलाबी बहर पांघरतात आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर लहरत जाऊन रस्त्यावर गालीचा विणतात. या पाकळ्या आणि वारा यांचं मैत्र असंच उमलत जातं. स्वातीच्या सरी शिंपल्यांमध्ये लपतात आणि मोती जन्माला घालतात. या सरी आणि शिंपले यांचं मैत्र मोत्यांच्या सरींनी गुंफलं जातं, झळाळून उठतं. अभ्रकाचे अनेक पदरी पापुद्रे असतात. कधीकधी त्या पापुद्य्रांवर सप्तरंग सांडल्याचा भास होतो. तसेच काहीसे मैत्रीचेदेखील असते. मानवी भावनांचे सारे रंग या मैत्रीच्या अभ्रकात अनुभवायला मिळतात. आयुष्याची सुखदु:खाच्या जरींनी भरलेली झोळी कुठेना कुठे रिकामी करणं गरजेचं असतं. अशावेळी हा मैत्रीचा खांदा हक्काचा आणि जवळचा वाटतो.
कधी कधी ना अशावेळी मला पूर्ण व्यक्त होता येत नाही. कधी वेळ पुरेसा पडत नाही. तर कधी काही सुचतच नाही बोलायला. मग काहितरी अपूर्ण राहिलयं, खूपसं सांगायचं राहिलयं अस वाटत राहात. पण कधीकधी खूप खूप सुंदर लोक भेटतात. त्यांच्याशी बोलण्याचे योग येतात. हे योगायोग ही खूप सुंदर असतात बरं का! उदाहरणार्थ, कोजागिरीची पौर्णिमा आपल्याला जागं करते. तसाच पहिला पाऊस. दरवर्षी भेटणारा मृगाचा पहिला पाऊस आणि त्यासोबतची शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी. ही मंडळी न चुकता भेटणारी; पण प्रत्येकवेळी मैत्रीच्या नव्या परिसीमा देणारी.
मी जर मनापासून मैत्री जपणारी असेन तर समोरच्यानेही ती जपावी ही रास्त अपेक्षा. आपण आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रेम शोधतो, मैत्री शोधतो. संवाद हवा असतो म्हणून वेळ देतो. आपल्याला जेव्हा सर्वात जास्त ऊर्जेची गरज असते तेव्हा ह मैत्रच ऊर्जास्त्रोत बनून आपल्याला सोबत करतात हे माझं ठाम मत आहे. भलेही हे लोक शरीराने जवळ नसतील, काळ-काम-वेग यात गुंतले असतील पण त्यांच्या नुसत्या सोबतीची जाणीव ही जगण्याला उभारी देऊन जाते.
प्रेम, माया, वात्सल्य, मैत्री असे कोणतेही नाव या बंधाला देता येईल पण या ऊर्जेच्या जोरावरच माणसं तरून जातात. मी थोडासा अँटिकपणा जपणारी आहे. नियम एकच मैत्रीचा, मैत्रीत सच्चेपणा पाहिजे, पारदर्शकता, मोकळेपणा पाहिजे. पण हा नियम अगदी प्रेमाने हं. उगीच भेटल्यावर जास्त ओळख नसताना घट्ट मिठ्या मारायच्या, सलगी दाखवायची. या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. तर, माझ्यासाठी एका मैत्रीला अशी सुरुवात झालीय. या मैत्रीची सुरुवात मी माझ्यापासून करतेय. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.
मला ना लहान मुलासारखं जगायला आवडतं.निष्पाप, निर्व्याज. रोजच्या जगण्यात, प्रत्येक दिवसात इतकं सारंकाही घडत असतं ना ते क्षण मला मनापासून जगायला आवडतात. अनुभवावेसे वाटतात. त्यातलं थ्रिल जपावसं वाटतं. मज्जा येते आणि यासाठीच मला माझ्याशी मैत्री कराविशी वाटते. ज्या बिझी शेड्यूलमध्ये, ज्या धकाधकीत आपण जगतो. त्यातून स्वतःसाठी जगायला, स्वतःला अनुभवायदा वेळच मिळत नाही. मग मित्र-मैत्रिणी देवाण-घेवाण ह्या सगळ्यांसाठी कुठून असणार? म्हणून मग भेटायचं आधी स्वतःलाच.जेव्हा मला माझ्यातलीच ही मैत्रीण सापडेल ना. त्याचा आनंद सांगता यायचाच नाही. अक्षरशः युरेका… युरेका…मला माझ्या या मैत्रिणीला आवडणाऱ्या काही गोष्टी आवर्जून करायच्यात. तिला आवडणारी गाणी ऐकायची आणि ऐकवायची आहेत. तिच्या आवडत्या विषयांवरची पुस्तकं वाचायचीत, खूप भटकायचंय, तिच्या सोबत आकाशाची निळाई वेचायचीय, तिला कवितेत उतरवायचीय माझ्या. या अन् अशा कितीतरी गोष्टी. तिच्यासोबत खळखळून हसायचयं आणि रडायचयंसुद्धा.
मी राहाते आजकाल सतत तिच्यासोबत. कितीही घाईगडबडीत असले तरी मी चांदण्यांनी भरलेलं आभाळ रोज बघते एक मिनीट स्तब्ध राहून. तिच्यासाठी आणि मग ज्या खऱ्याखुऱ्या मित्रमैत्रिणी आहेत. त्यांना भेटल्यासारखं वाटतं, त्यांच्यात मिसळून गिटारवर पुरानी जिन्स और गिटार म्हणल्यासारखं वाटत. मनात विचार येतो. त्याही सगळ्याजणी असेच मीस करत असतील का स्वतःला. स्वतःत लपलेल्या मैत्रीला. जगण्याच्या दैनंदिन लढाईत त्या ही काहीतरी साठवत असतील. आठवत असतील. काही सोडून देत असतील. कधी मनाचे कप्पे रिते करताना त्यात विरघळत असतील. रोज नव्याने रुजून येत असतील. या सगळ्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना मला पुन्हा द्यायचाय मैत्रीचा हात. पुन्हा जगूया नव्याने मैत्रीसाठी अन् साजरं करूया जगणं.
– मानसी चिटणीस