आपले कोण आणि परके कोण? हेच नेमके आपल्याला ओळखू न आल्यामुळे खूपच मनस्ताप होतो. म्हणूनच आपले मनःस्वाथ्य कसे टिकवून ठेवावे याविषयी थोडेसे…
आपल्या अवती-भोवती बऱ्याच व्यक्ती असतात, त्यातील काही व्यक्ती आपण अगदी घरातील, जवळचे समजत असतो. आपल्या मित्रांपैकी बरेचजण कोणातरी मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन मोठ्या अभिमानाने सांगत असतात की, “अहो ते आमचे पाहुणे आहेत, ते आमचे घरचेच आहेत.’ पण वस्तुस्थिती काय असते?
आपले काही काम अडले असल्यास किंवा आपण काही अडचणीत सापडल्यास, आपण अगदी मोठ्या अपेक्षेने अशा आपल्या घरातील, जवळच्या व्यक्तींकडे जातो पण पदरी निराशाच पडते. त्यांचा नकली मुखवटा गळून पडतो आणि त्यांचा खरा “काळा चेहरा’ दिसतो. ज्यांना आपण जवळचे, घरचे समजत असतो ते आपले नसतातच.
अशी ही नकली मुखवटे परिधान करणारी माणसे आपल्याला ओळखायला वेळही लागू शकतो. पण आपण अशी माणसे ओळखायला शिकले पाहिजे. अशी माणसे त्यांना जोपर्यंत आपल्यापासून त्यांना फायदा आहे तोपर्यंतच आपल्या जवळ असतात, संपर्कात असतात. आपल्याला नंतर “सुख के सब साथी दुख में ना कोई…’ असा अनुभव येतो. ही माणसे आपले केवळ “चित्त हरण करणारे नसून वित्त हरण करणारे’ असतात.
बऱ्याच व्यक्ती केवळ त्यांचा व्यवसायाचा भाग म्हणून आपल्याशी जवळीक साधत असतात, गोड बोलत असतात. एखाद्या मोठ्या व्यवसायाचे आपण जेव्हा ग्राहक म्हणून संपर्कात येतो, तेव्हा तेथील महिला कर्मचारीसुद्धा आपल्याशी अगदी मधाळ बोलत असतात. पण तीच महिला जेव्हा इतर कोणत्या ठिकाणी जर भेटली तर आपल्याला ओळखही दाखवत नाही. म्हणजेच ती तिच्या कामाचा भाग म्हणून नकली मुखवटा पांघरून आपल्याशी बोलत असते. पण आपण अशा महिलेच्या मधाळ बोलण्यात पूर्णपणे बुडून गेलेलो असतो आणि आपला खिसा बराच रिकामा करून टाकलेला असतो.
आपण बऱ्याच वेळा कोणा मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात येतो. त्या व्यक्तीचे आपल्याकडे काही काम असू शकते किंवा आपण त्या व्यक्तीचे ग्राहक असतो. अशा प्रसंगी त्या व्यक्तीला आपल्याकडून काही काम काढून घ्यावयाचे असते किंवा आपल्याकडून पैसे तरी हवे असतात. मग ती व्यक्ती अगदी साखरसुद्धा कमी गोड वाटेल इतके आपल्याशी गोड बोलत असतात. आपल्याला वाटते (खरे तर आपला गैरसमज असतो) की ही मोठी व्यक्ती म्हणजे खरेच आपली घरची आहे, खरेच ती व्यक्ती आपल्याला घरची समजत आहे. पण एक दिवस त्या व्यक्तीचा काळा चेहरा आपल्या समोर येतोच. ती व्यक्ती मोठी नसून “संधी साधू’ आहे हे लक्षात येते पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो, वेळ निघून गेलेली असते.
आपण बऱ्याच वेळा “एकतर्फी प्रेमातून…’ अशा बातम्या वाचत असतो. येथे प्रश्न असा असतो की, “मी ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करत आहे ती व्यक्ती माझ्यावर तितकेच प्रेम करते का?’ जर ती व्यक्ती प्रेम करत नसेल तर आपण त्या व्यक्तीमागे धावण्यात काय अर्थ आहे? आपण आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ त्या व्यक्तीसाठी का वाया घालवायचा? आपल्याला आयुष्यात बरेच काही करण्यासारखे आहे, तिकडे लक्ष द्यावे. शेवटी आपला आत्मसन्मान आपल्याला असतोच ना! तो आत्मसन्मान आपण का गहाण ठेवायचा? अशाच प्रेमाची दुसरी बाजू अशी की “ती व्यक्ती केवळ आपल्या पैशावर प्रेम करणारी असेल, आपल्यावर नाही…’
आपल्याला अशाच प्रकारे वेगवेगळे नकली मुखवटे घालून आपल्या भोवती असणारी माणसे ओळखायची आहेत आणि त्यांच्याशी संपर्क तोडून टाकायचा आहे. अशी नकली माणसे ओळखण्यासाठी वेळ लागेलही, पण आपण संयमानेच काम करावयाचे आहे. आपण आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची “लिटमस चाचणी’ (शितावरून भाताची परीक्षा) घेतली पाहिजे, व्यक्तीला जोखायला पाहिजे. यासाठी त्या व्यक्तींकडून आपण काही मदत मिळते का? याची चाचपणी करावी. अशा व्यक्तींवर काही निमित्ताने रागावून पहावे, त्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया येते ते पहावे जर ती व्यक्ती आपल्याला जवळची समजत असेल तर, आपले रागावणे एवढे मनावर घेणार नाही.
किंवा ज्या हेतूने एखादी व्यक्ती आपल्याशी जवळीक साधत आहे- जसे पैसे वगैरे तर आपल्याकडे पैसेच नाही किंवा बराच तोटा झाला अशी बतावणी करून पहा, त्यानंतरही ती व्यक्ती आपल्याशी जवळीक साधत असेल तर काहीच प्रश्न नाही. या व अशा प्रकारच्या चाचण्या घ्यायला काहीच हरकत नाही. आपल्या चाचणीवर ज्या व्यक्ती खऱ्या उतरतील त्यांच्यासाठी मग जीवाचे रान करायला काहीच हरकत नाही.
आपण ज्याला आपले समजतो आणि तोही आपल्याला आपला समजतो असे कितीही चांगले संबंध असले तरी आपण सर्वच व्यवहार आणि आपल्या आयुष्यातील सर्वच घटना त्या व्यक्तीला सांगण्याची आवश्यकता नाही. कधी कोणाची मती फिरेल ते सांगता येत नाही. पुढे जाऊन जर आपले अशा व्यक्तीसोबत काही बिनसले तर त्या व्यक्तीस आपल्या जमेच्या उणिवेच्या सर्वच बाजू माहीत असतात त्यामुळे आपल्याला फारच त्रास होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी आपण काही माहिती गोपनीय ठेवायला हवी.
आपण कोणाला “आपले’ मानण्यापूर्वी थोडा संयम बाळगायला हवा. जर समोरची व्यक्ती एक पाऊल पुढे सरकली तर आपणही एक पाऊल पुढे सरकावे. पण हुरळून जाऊन त्या व्यक्तीच्या मागे धावण्यात काहीच हशील नाही. आपल्या सादाला प्रतिसाद मिळायला हवा, तसेच आपणही त्या व्यक्तीच्या सादाला प्रतिसाद द्यायला हवा. तरच आपले सुर जुळले असे समजायला हरकत नाही. नाही तर तू तुझ्या वाटेला मी माझ्या वाटेला!
जर आपण आपले कोण आणि परके कोण हे ओळखण्यात यशस्वी झालो तर आपले आयुष्य बऱ्याच प्रमाणात सुखी होते. विनाकारण मनःस्ताप होत नाही. नुकसान होत नाही. आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून केवळ बिकट परिस्थितीत शांत कसे राहता येईल आणि या नकली मुखवट्याच्या भुलभुलैयात कसे अडकणार नाही या विचारांचे पुष्प आपल्या मनोदेवतेला अर्पावे.
– अनिकेत भालेराव